पुणे येथे राष्ट्रीय पातळीवरील सन्मानाने गौरव; सामाजिक व साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या व मुक्त पत्रकार सरोज आल्हाट यांना भारत सरकारच्या नीती आयोग संलग्नित डॉ. मणिमाई देसाई प्रतिष्ठान व आरोग्य सेवा संस्थेच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांना त्यांच्या बहुआयामी योगदानाबद्दल देण्यात आला आहे.
पुणे येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह येथे पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खादी व ग्रामोद्योग मंत्री रवींद्र साठे यांच्या हस्ते आल्हाट यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे यांनी सांगितले की, “साहित्य, समाजसेवा, पत्रकारिता तसेच सांस्कृतिक क्षेत्रात सरोज आल्हाट यांनी अनेक वर्षे सातत्याने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील या पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याचे स्पष्ट केले.
सरोज आल्हाट या केवळ कवयित्री म्हणूनच नव्हे, तर सामाजिक प्रश्नांवर लेखन व जनजागृती करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. रुग्णसेवा देखील त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग उल्लेखनीय असून त्यांनी महिलांविषयक, शिक्षण आणि समाजजागृती विषयांवर प्रभावी काम केले या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यापूर्वीही त्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
