• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

कापरी नदीतील अवैध वाळू उपसा बंद होत नसल्याने आदिवासी युवकांचे उपोषण

ByMirror

Aug 17, 2024
कापरी नदीतील अवैध वाळू उपसा बंद होत नसल्याने आदिवासी युवकांचे उपोषण

अवैध वाळू उपसा बंद होऊन वाळू तस्करांच्या जाचापासून सुटका न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत के.के. रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध वाळू उपसाची तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने आदिवासी सामाजिक कार्यकर्ते राजू लक्ष्मण पवार यांनी गुरुवारी (दि.15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले. तक्रार केल्याप्रकरणी वाळू तस्करांकडून धमक्या दिल्या जात असून, आनखी जोमाने वाळू उपसा सुरु करण्यात आला असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. तर सदर अवैध वाळू उपसा बंद होऊन वाळू तस्करांच्या जाचापासून सुटका न झाल्यास आदिवासी युवकांसह सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या उपोषणात किरण बर्डे, गोपीनाथ पवार हे युवक सहभागी झाले होते.


ढवळपुरी (ता. पारनेर), नांदगाव शिंगवे (ता. नगर) आणि नांदगाव-देहरे-नगर मार्गे के.के. रेंज या लष्करी भागातील कापरी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. वाळू तस्करीकडे महसुल विभाग व संबंधित पोलीस प्रशासनाची डोळेझाक सुरू असल्याने कोणालाही न जुमानता ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी व बोटी लाऊन बेसुमार वाळू उपसा सुरु आहे.

दररोज ट्रॅक्टर, डंपरद्वारे अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात वाळू वाहतुक सुरु आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी व ग्रामस्थांना त्रास होत आहे. या पार्श्‍वभूमीवर वाळू तस्करांपासून होणारा त्रास थांबावा म्हणून 3 जुलै रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे वाळू उपसा थांबविण्याची मागणी करण्यात आली होती. मागील महिन्यात पाच ते सहा जेसीबी मशीन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा सुरु होता. याप्रकरणी निवेदनद्वारे तक्रार केल्याप्रकरणी वाळू तस्करांनी धमकावले असल्याचे पवार यांनी म्हंटले आहे.


6 ऑगस्ट रोजी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात स्मरणपत्र व वाळू उपसाचे व्हिडिओ चित्रीकरणाचे पुरावे देऊनही कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. वाळू तस्करांना पाठीशी घालण्यासाठी ढवळपूरी, नांदगाव येथील महसूल व पोलीस प्रशासन सहभागी असल्याने या अवैध वाळू उपसावर कारवाई होत नाही. तर अर्ज, तक्रारी केल्यास सबंधीत अधिकारीच वाळू तस्करांना माहिती पुरवीत असल्याचा आरोप उपोषणकर्ते राजू पवार यांनी केला आहे.



अवैध वाळू वाहतुकीपासून ढवळपुरी (ता. पारनेर) व नांदगाव शिंगवे (ता. नगर) येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सहा वाळू काढण्याच्या बोट सुरु असून, वीस ते पंचवीस हायवा टिप्पर वाळू घेऊन भरधाव वेगाने चालत आहे. या गाड्यांचा जाण्या-येण्याचा मार्ग ढवळपुरी, सुतारवाडी, लालूचा तांडा, जांभूळबन हा असून, ते या मार्गाने के.के. रेंजच्या कापरी नदीत वाळू भरण्यास येतात व वाळू भरुन जातात. सध्या वाळूतस्करांनी वाळू काढण्यासाठी वाळूच्या बोटी सुरु केल्या असून, कापडी नदीमध्ये के.के. रेंज हद्दीत मुळा धरणांमध्ये नांदगाव व जांभुळबंद हद्दीत उपसा सुरु आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *