• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा गौरव

ByMirror

Jul 7, 2025
कृष्णाली फाउंडेशनचा उपक्रम

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गुणवंतांचा गौरव आणि वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी पुस्तके भेट


कृष्णाली फाउंडेशनचा उपक्रम


समाजाची गरज ओळखून कृष्णाली फाऊंडेशनने राबविलेला उपक्रम दिशादर्शक -राणीताई लंके

नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कृष्णाली फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन गुणवंतांचा गौरव करण्यात आला. कर्जुने खारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला.


माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी युवा शास्त्रज्ञ डॉ. रणजीत राऊत, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेश कांबळे, सेवानिवृत्त जिल्हा मेट्रन छाया निमसे, आपला मावळाचे अध्यक्ष रामेश्‍वर निमसे, उद्योजक संग्राम आंधळे, शिवाजी उबाळे, गावचे माजी उपसरपंच अंकुश शेळके, उपसरपंच रामेश्‍वर निमसे, नवनाथ शिंदे, वजीर शेख, गणेश तोरडमल, मेजर भागवत शेळके, भारत बोबडे, स्वप्नील निमसे, गणेश मोरे, अमर बोबडे, कैलास लांडे आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.


दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेतील मुलींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रियंका पाटील शेळके यांनी केले. जिल्हा परिषद शाळेत सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात. त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि मराठी माध्यमांच्या शाळांना चालना देण्याच्या उद्देशाने कृष्णाली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांनी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता.


इयत्ता पहिली मध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पहिलीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या- पेन – पेन्सिल किट हे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. इतर विद्यार्थ्यांना देखील शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी गोष्टीची पुस्तके, महापुरुषांचे चरित्र पुस्तके भेट देण्यात आली.


राणीताई लंके यांनी समाजाची गरज ओळखून कृष्णाली फाऊंडेशनने राबविलेला उपक्रम दिशादर्शक असल्याचे सांगितले. कृष्णाली फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांनी ग्रामीण भागात मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाल्यास खऱ्या अर्थाने सशक्त भारताचे स्वप्न साकारले जाणार असल्याचे सांगितले.


गेल्या 30 वर्षी पासून अविरतपणे रुग्णसेवा करणाऱ्या, गावातील अनेकांना मदतीचा हात देणाऱ्या छायाताई निमसे यांचा कृष्णाली फाऊंडेशनकडून सन्मान करुन त्यांना पुरस्कार देण्यात आला. युवा शास्त्रज्ञ रणजीत राऊत यांचा देखील वटवृक्ष देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतील एका विद्यार्थिनीने खासदार निलेश लंके आणि राणीताई लंके यांचे काढलेले स्केच सौ. लंके यांना भेट दिले. पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी फोनवर संपर्क साधून मुलांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कालापहाड यांनी केले. आभार कैलास लांडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी उद्योजक सागर गांधी व संग्राम आंधळे यांचे सहकार्य लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *