महेश लोंढे यांच्या माध्यमातून प्रभागातील प्रश्न सुटणार -पै. सुभाष लोंढे
नगरसेवक पै. महेश लोंढे यांच्या पाठपुराव्याने विकास काम मार्गी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड प्रभाग क्रमांक 9 मधील श्रीकृष्ण नगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपलब्ध करुन दिलेल्या निधीच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभामंडपाच्या कामाचे भूमीपूजन उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी महापालिका स्थायी समितीचे सभापती पै. सुभाष लोंढे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक निखिल वारे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, अभिजीत बोरुडे, सुषमा गोळे, सुनीता कर्डिले, विशाखा मिसाळ, पल्लवी बुगे, हिराबाई गोरे, लताबाई लोंढे, राधाबाई अंधारे, रंजना ढवळे, सुभद्रा कुकाटे, आशा गोरे, सुनील वाव्हळ, प्रभाकर कोंडा, अशोक बुगे, भगवान ढवळे, आप्पा कदम, खांदवे सर, सखाराम गोरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले की, महापालिकेत मिळालेल्या बहुमतामुळे शहरात सर्वच प्रभागात विकास कामे झपाट्याने होत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून निधी देखील उपलब्ध करुन दिला जात आहे. शहरात विकासाची गंगा वाहती झाली आहे. दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे नगरसेवक कायम तत्पर असून, प्रभाग 9 मध्ये पै. महेश लोंढे यांचे उत्तम प्रकारे विकासकामाचे नियोजन व कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल मोहिते म्हणाले की, श्रीकृष्ण नगर परिसरात चांगले सभामंडप उभारले जात आहे. या सभामंडपाचा स्थानिक नागरिकांना सांस्कृतिक भवन म्हणून उपयोग होणार आहे. आरसीसी बांधकाम असल्याने छोटे-मोठे कार्यक्रम होईल आणि त्यापुढे देखील आणखी मजले उभारून विविध सुविधा निर्माण करता येणार आहे. जनतेने महायुतीला दिलेले बहुमत विकास कामातून उतराई केली जात आहे. विकास कामासाठी राज्य व केंद्र सरकार शहराच्या पाठिशी असल्याचे ते म्हणाले.
पै. सुभाष लोंढे म्हणाले की, राजकारण व समाजकारणाचा वारसा लाभलेले महेश लोफ्लढे यांच्या माध्यमातून प्रभागातील प्रश्न सुटणार आहे. शहरातील मुलभूत प्रश्न लक्षात घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. शहराच्या विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून मिळत असलेल्या निधीमुळे विकासकामे झपाट्याने होत असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारण व समाजकारणाचे धडे घेऊन पहिल्यांदा नगरसेवक झालेले पै. महेश लोंढे नागरिकांच्या समस्येवर विशेष लक्ष देत आहे. आपल्या कार्यातून त्यांनी विकासकामांद्वारे लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. एका फोनवर लोकांच्या समस्येसाठी ते धावून येतात, हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे सर्व नागरिक पाहत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
