भगवान श्रीकृष्ण-राधेची मनमोहक थीम; फुलांची सजावट, बासरी आणि आकर्षक रांगोळीने घराला मिळाली भक्तिमय रूप
घराच्या पहिल्या पायरीपासून श्रीकृष्ण-राधेची थीम; पाहण्यासाठी महिलांची गर्दी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रेल्वे स्टेशन आनंदनगर परिसरात गौरी-गणपती आगमनाचा उत्साह पाहायला मिळाले. शुक्रवारी (दि. 18 सप्टेंबर) मोनिका गणेश लालबागे यांच्या निवासस्थानी ‘वृंदावनात गौरी-गणपतीचे आगमन’ या संकल्पनेवर आधारित आकर्षक सजावट करण्यात आली. भगवान श्रीकृष्ण आणि राधेच्या प्रेममय वृंदावनाची अनुभूती देणाऱ्या या सजावटीने परिसरातील महिलांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
लालबागे यांच्या घराच्या पहिल्या पायरीपासूनच वृंदावनाची संकल्पना साकारण्यात आली होती. भगवान श्रीकृष्ण आणि राधेची मनमोहक प्रतिकृती, फुलांची आकर्षक सजावट तसेच बासरीच्या माध्यमातून वृंदावनातील भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात आले. घराच्या प्रवेशद्वारापासूनच सजावटीचे बारकावे लक्ष वेधून घेत होते.
घराच्या परिसरात साकारण्यात आलेली भगवान श्रीकृष्णाची आकर्षक रांगोळी सजावटीचे विशेष आकर्षण ठरली. विविध रंगांच्या माध्यमातून साकारलेल्या या रांगोळीने परिसरातील महिलांचे लक्ष वेधून घेतले. घराबाहेर फुलांची केलेली सजावट आणि बासरीच्या प्रतिकृतीमुळे संपूर्ण परिसराला वृंदावनाचे स्वरूप प्राप्त झाले होते. गौरी-गणपतींच्या सभोवतालीही आकर्षक सजावट करण्यात आली होती. विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांची कलात्मक मांडणी करून गौरी-गणपतींच्या पुढील भागाची सजावट करण्यात आली. पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक कल्पकता यांचा सुंदर मिलाफ या सजावटीत पाहायला मिळाला.
‘वृंदावनात गौरी-गणपतीचे आगमन’ ही संकल्पना पाहण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती. गौरी-गणपतींच्या दर्शनासोबतच सजावटीतील बारकावे आणि विविध कलाकृती पाहण्याची उत्सुकता महिलांमध्ये दिसून आली. आडत व्यापारी गणेश लालबागे यांच्या परिवारासह नातेवाईक आणि आप्तेष्टांनी ही आकर्षक सजावट साकारण्यासाठी परिश्रम घेतले.
घराभोवती करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईनेही सजावटीला अधिक आकर्षक रूप प्राप्त झाले होते. फुले, रांगोळी, बासरी, विद्युत रोषणाई आणि वृंदावनातील कृष्ण-राधेची संकल्पना यामुळे संपूर्ण घर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाले होते.
गौरी-गणपतींचे आगमन म्हणजे घरातील आनंद, श्रद्धा आणि मांगल्याचा सोहळा मानला जातो. ‘सोन्याच्या पावलांनी आलेल्या गौरी-गणपतींनी घराघरांत मंगलमय वातावरण निर्माण केले,’ अशी भावना यावेळी परिसरातील महिलांनी व्यक्त केली.

