• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

तरुणाईच्या जल्लोषात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचा समारोप

ByMirror

Nov 10, 2025
युवक हीच खरी राष्ट्राची ऊर्जा -ज्ञानेश्‍वर खुरंगे

विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण


युवक हीच खरी राष्ट्राची ऊर्जा -ज्ञानेश्‍वर खुरंगे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आणि न्यू आर्ट्‌स, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवात युवक-युवतींनी आपले कलागुण सादर करत विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.


राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पडलेल्या या महोत्सवात कथालेखन, कविता लेखन, चित्रकला, वक्तृत्व तसेच लोकनृत्य व लोकगीत अशा कलात्मक स्पर्धा रंगल्या होत्या. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


समारोपीय कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी प्रियंका खिंडरे, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, भाऊराव वीर, बालाजी केंद्रे, प्रविण कोंढावळे, वरिष्ठ लिपिक भाऊसाहेब जगताप, प्रा. डॉ. श्‍याम शिंदे, चंद्रकांत देठे, संजय ससाणे, नूरील प्रभात भोसले, संगीता देऊळगावकर, निशिगंधा डावरे, प्रा. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, प्रा. रवींद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे म्हणाले की, युवक हीच खरी राष्ट्राची ऊर्जा आहे. क्रीडा, कला, साहित्य, विचार आणि संस्कार यांचा संगम जेव्हा युवकांच्या व्यक्तिमत्त्वात घडतो, तेव्हा त्या समाजाला विकासात्मक दिशा मिळते. युवा महोत्सव म्हणजे केवळ स्पर्धा नाही, तर स्वतःला ओळखण्याचा आणि देशासाठी काहीतरी देण्याचा एक उत्सव आहे. आजच्या डिजिटल युगात युवक-युवतींनी अशा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.


या महोत्सवातील वैयक्तिक स्पर्धांमधील प्रथम दोन क्रमांकाचे स्पर्धक आणि सांघिक स्पर्धांमधील विजेते संघ विभागीय युवा महोत्सवासाठी पात्र ठरले असून, त्यातून पुढे महाराष्ट्राचा संघ राष्ट्रीय युवा महोत्सवात राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. महोत्सव यशस्वी करण्यासाठी सागर पवार, अवधूत शेजूळ, मिना पाचपुते, साक्षी दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी प्रियंका खिंडरे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे यांनी मानले.


जिल्हास्तरीय युवा महोत्सव विजेते पुढीलप्रमाणे:-
काव्य लेखन स्पर्धा प्रथम- आरती आडसुरे, द्वितीय- शामल पाटोळे, तृतीय- चेतन औटे.
वक्तृत्व स्पर्धा प्रथम- साक्षी साठे, द्वितीय- आरती आडसुरे, तृतीय- प्रेरणा हिवाळे.
कथालेखन स्पर्धा प्रथम- दिव्या ओहोळ, द्वितीय- चेतन औटे, तृतीय- सुरज चव्हाण.
चित्रकला स्पर्धा प्रथम- प्रेषिता रावडे, द्वितीय- स्वरा टोणपे, तृतीय- सायली जाधव.
समूह लोकनृत्य प्रथम- न्यू आर्ट्‌स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, पारनेर (पंती नृत्य), द्वितीय- माणिकराव पाटील कॉलेज, अहिल्यानगर (वंदे मातरम).
समूह लोकगीत प्रथम- न्यू आर्ट्‌स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, पारनेर.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *