आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्येमध्ये मूत्रविकार तपासणी आणि उपचार शिबिरात 66 रुग्णांची मोफत तपासणी
गंभीर आजार टाळण्यासाठी वेळोवेळी तपासणी करण्याचे डॉक्टरांचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मूत्रविकाराच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जावून ते गंभीर आजाराचे रुप धारण करतात. योग्यवेळी निदान व उपचार केल्यास मूत्रविकाराच्या सर्व समस्या बरे होतात. तसेच आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्यावत तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली यावरील शस्त्रक्रिया अद्यावत मशिनरी, दुर्बीणद्वारे होत आहे. गंभीर आजारांना तोफ्लड देण्यापेक्षा योग्यवेळी तपासणी व औषधोपचार हेच निरोगी जीवनाचे मुलमंत्र ठरत असल्याचे प्रतिपादन मूत्रविकार तज्ञ डॉ. अजित दरंदले यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित मूत्रविकार तपासणी आणि उपचार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. दरंदले बोलत होते. यावेळी मूत्रविकार तज्ञ डॉ. अमेय सांगळे, डॉ. वसंत कटारिया, डॉ. आशिष भंडारी, माणकचंद कटारिया, अभय गुगळे, सुभाष मुनोत, वसंत चोपडा आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. वसंत कटारिया म्हणाले की, हॉस्पिटलची स्थापना करतानाच सेवाभाव हा उद्देश समोर ठेऊन आजपर्यंत रुग्णसेवेचा वसा जोपासला जात आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलचे मोफत शिबिर सर्वसामान्य घटकांना आधार देत आहे. एका छताखाली सर्व आरोग्य सेवा मिळत असल्याने सर्वसामान्यांना याचा लाभ घेणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. अमेय सांगळे म्हणाले की, वाढत्या उन्हाळ्यामुळे उष्माघातचे प्रमाण वाढत आहे. किडनी स्टोनचे प्रमाण उद्भवत असून, यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. काही त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तपासणी करणे गरजेचे आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मूत्रविकाराच्या सर्व समस्यांवर उपचार उपलब्ध असून,महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या शस्त्रक्रिया होत असल्याची त्यांनी माहिती दिली. तर मूत्रविकार, पोटात दुखणे, लघवीचे त्रास अंगावर न काढता तातडीने प्राथमिक तपासणी करण्याचे आवाहन केले.
या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी प्रोस्टेट रोग उपचार, युरेथ्रल स्ट्रीचर रोग व्यवस्थापन, पुरुष वंध्यत्व समुपदेशन, मूल्यमापन आणि व्यवस्थापन, महिलांचे मूत्र मार्गातील विकार, मूत्रमार्ग, मुत्राशय, प्रोस्टेट, पुरुषांचे जननेंद्रिय, अंडाशय कर्करोग व्यवस्थापन आदी संदर्भात 66 रुग्णांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार माणकचंद कटारिया यांनी मानले.
