बाबासाहेबांना अभिवादन करून कार्याची सुरुवात
युवकांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता सामाजिक प्रश्नांवरही पुढाकार घ्यावा -अमित काळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नगर शहर युवक कार्याध्यक्षपदी अजय बडोदे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांच्या हस्ते बडोदे यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
या नियुक्ती सोहळ्याच्या प्रारंभी मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, युवक नगर तालुका सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, उपाध्यक्ष अजय पाखरे, चंद्रशेखर पंचमुख, विजय शिरसाठ, दीपक भिंगारदिवे, संदीप शिरसाठ, कृष्णा गाडेकर, मंगेश ससाने, गणेश गाडेकर, गहीनाथ आजबे, अमर बडेकर, प्रशांत पवार, निखिल गणेश सुर्यवंशी, प्रताप कराळे, सोहेल शेख, गोविंद जगदाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, “रिपब्लिकन पक्षाची विचारधारा ही सामाजिक न्याय, समता आणि बंधुता यावर आधारित आहे. आजच्या तरुणांनी या विचारांना आत्मसात करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे गरजेचे आहे. अजय बडोदे हे सामाजिक कार्यात सक्रिय व युवकांमध्ये चांगले संघटन असलेले कार्यकर्ते असून त्यांच्या नियुक्तीमुळे नगर शहरात युवक संघटना अधिक सक्षम होईल. युवकांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता सामाजिक प्रश्नांवरही पुढाकार घ्यावा. सामाजिक अन्याया विरोधात संघटित लढा उभारण्यासाठी पक्ष कटिबद्ध असून, सत्तेच्या माध्यमातून समाजातील प्रश्न सोडविण्याचे काम केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त युवक कार्याध्यक्ष अजय बडोदे म्हणाले की, पक्षाच्या वतीने टाकण्यात आलेली जबाबदारी व विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कार्य केले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. नगर शहरातील युवकांना एकत्र करून संघटन बळकट करणे, त्यांना योग्य दिशा देणे आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांना सक्रिय करणे हे प्रमुख उद्दीष्ट राहणार आहे. आगामी काळात विविध जनहिताच्या उपक्रमांद्वारे पक्षाची ताकद वाढवण्याचा व सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील व्यक्तींना मिळवून देण्यासाठी कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
