विविध धार्मिक सोहळ्यासाठी भाविकांची उपस्थिती; जत्था किर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील गुरुद्वारा भाई दयासिंहजी, गोविंदपुरा येथे मंगळवारी (दि.14 एप्रिल) बैसाखी गुरपूरब अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा झाला. यावेळी गुरुद्वाऱ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यासाठी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
12 एप्रिल पासून श्री अखंड पाठ साहिबजी यांचा आरंभ करण्यात आला होता. त्याची समाप्ती मंगळवारी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडली. या पवित्र प्रसंगी हजूरी रागी भाई सुखदेव सिंहजी जत्था तसेच रागी साहेब सिंहजी (पटियालावाले) यांनी गुरुबाणी कीर्तन सादर करून संगतांना आध्यात्मिक आनंद दिला. कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी गुरुबाणीचा लाभ घेतला. उपस्थित सर्व संगतांसाठी गुरू का लंगर आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये भक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
गुरुद्वाराचे अध्यक्ष सरदार बलदेवसिंह वाही म्हणाले की, बैसाखी हा शीख पंथासाठी अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक दिवस आहे. या दिवशी संगत एकत्र येऊन गुरूंच्या शिकवणीप्रमाणे सेवा, सिमरन आणि समाजातील बंधुभाव वाढवण्याचा संकल्प करते. गुरुद्वारा भाई दयासिंहजी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात कार्यक्रम पार पडला. भविष्यातही समाजसेवेचे कार्य अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरुद्वारा व्यवस्थापन समिती तसेच सर्व सेवकांचे विशेष योगदान लाभले. गुरुद्वारा येथे आलेल्या भाविकांना गुरु नानक देवजी (जीएनडी) ग्रुपच्या वतीने थंडाई व फळांची सेवा देण्यात आली. शेवटी लंगरने कार्यक्रमाची सांगता झाली.
