18 विद्यार्थी एन.एम.एम.एस. परीक्षेत पात्र; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (एन.एम.एम.एस.) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांसाठी दरवर्षी 12 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या केंद्रशासित परीक्षेस विद्यालयातील एकूण 29 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 18 विद्यार्थ्यांनी यश मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. या यशामध्ये सत्यजीत संजय नाबगे याने विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला असून आयुष रवींद्र फाटक याने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही विद्यार्थ्यांनी गणित विषयात 20 पैकी 20 गुण मिळवून आपली उत्कृष्ट गुणवत्ता सिद्ध केली. तसेच बुद्धिमत्ता विषयामध्ये सत्यजीत नाबगे याला 90 पैकी 84, तर आयुष फाटक याला 90 पैकी 83 गुण मिळाले आहेत.
या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांमध्ये ऋतुजा पोकळे, यशवर्धन पाटील, प्रिया दिघे, अभय वनवे, सार्थक भापकर, सोहम काळे, अथर्व चाकुरे, श्रेया लोखंडे, अनुष्का कर्डिले, समृद्धी मोढवे, रेवा आळंदी, श्रावणी कराड, ज्ञानेश्वरी खेडकर, मोहम्मद तांबोळी, अमृता प्रजापती आणि सोनाक्षी नवसुपे यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि अभ्यासाच्या बळावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अर्जुनराव पोकळे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. विक्रम वाडेकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, माजी सचिव प्राचार्य शिवाजीराव भोर, विष्णुपंत म्हस्के, अंबादास गारुडकर, शामराव व्यवहारे, विश्वासराव काळे, माजी सहसचिव के. एच. शिंदे, तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख मंगेश कारखिले (गणित), सुनीता लांडगे (सामान्य विज्ञान), अमृता थोरात (समाजशास्त्र) आणि प्रदीप पालवे (बुद्धिमत्ता) या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना ही उल्लेखनीय कामगिरी करता आली, असे यावेळी मान्यवरांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
