• Fri. Jun 6th, 2025

संबोधी वस्तीगृहातील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त

ByMirror

Sep 28, 2024

मृत्यूप्रकरणाचा तपास करुन दोषी संस्थाचालक व रजिस्टार यांच्यावर कारवाईची मागणी

माणुसकी सोशल फाउंडेशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- फकीरवाडा येथील संबोधी विद्यार्थी वस्तीगृहातील विद्यार्थ्याचा मृतदेह निघोज (ता. पारनेर) येथील पाण्याच्या कुंडात सापडला असताना, या मृत्यू प्रकरणी संशय व्यक्त करुन माणुसकी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक दांडगे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर याप्रकरणी दोषी संस्थाचालक व रजिस्टार यांच्यावर सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करण्याचे म्हंटले आहे.


प्रकाश राजेंद्र निंबाळकर (रा. गेवराई, जिल्हा बीड) हा विद्यार्थी फकीरवाडा येथील संबोधी विद्यार्थी वस्तीगृहात राहत होता. तर दादासाहेब रूपवते विद्यालयात इयत्ता 11 वी मध्ये शिक्षण घेत होता. 20 सप्टेंबर रोजी निघोज (ता. पारनेर) या ठिकाणी तो पाण्याच्या कुंडामध्ये पडून मयत झाला. सदरील मयताचा मृतदेह संशयास्पद वाटत आहे. वस्तीगृहाच्या संस्थेची मान्यता पाचवी ते दहावी पर्यंत आहे. तरी देखील अकरावीच्या विद्यार्थ्यांला वस्तीगृहात प्रवेश कसा दिला गेला? अकरावी, बारावीची मान्यता असेल, तर तो विद्यार्थी निघोज येथील पाण्याच्या कुंडा पर्यंत गेला कसा? हा प्रश्‍न तक्रारदार दांडगे यांनी उपस्थित केला आहे.


हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत अससून, सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर यामध्ये दोषी असल्यास वस्तीगृहाचे संस्थाचालक व रजिस्टार यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *