अण्णाभाऊ व टिळकांनी अन्यायाविरोधात जागृती करुन समाजाला दिशा दिली -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमगाव वाघा (ता. नगर) येथे साजरी करण्यात आली. गावातील नवनाथ विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

गावात झालेल्या अभिवादन कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक किसन वाबळे, सरपंच रुपाली जाधव, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, तेजस केदारी, भानुदास लंगोटे, अशोक डौले, भानुदास ठोकळ, ज्ञानदेव कापसे, दिपक गायकवाड, अभी पाचरणे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, गोपी पाचारणे, अजय ठाणगे, अरुण काळे, संगीता आतकर, दिपाली कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिक वर्गासाठी संघर्ष केला. श्रमिक वंचितांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी शाहिरीतून समाज जागृतीचे कार्य केले. वयाच्या सोळाव्या वर्षी कामगार चळवळीत सहभागी होऊन त्यांनी कष्टकरींच्या व्यथा मांडल्या. त्यांचे लिखाण मानवी जीवनाला नवा विचार देणारे आहे. तर लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटीशांविरोधात समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. दोन्ही महापुरुषांनी अन्यायाविरोधात जागृती करुन समाजाला दिशा दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
