• Mon. Feb 23rd, 2026

मनोज जरांगे यांना उपोषण व आंदोलनापासून रोखावे

ByMirror

May 29, 2024

त्या उपोषण व आंदोलनाने जातीय तेढ निर्माण होत असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण व आंदोलनाने जातीय तेढ निर्माण होत असल्याने राज्य सरकारने त्यांच्या उपोषण व आंदोलनाची परवानगी नाकारुन त्यांना रोखण्याची मागणी भिंगार येथील सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांना आंदोलन व उपोषण करण्याचा संविधानाने दिलेला अधिकार आहे, परंतु त्यांच्या आंदोलन व उपोषणातून जातीय तेढ निर्माण होत आहे. गावागावात वाडी-वस्तीवर राहणारे व एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे ग्रामस्थ एकमेकांना जातीच्या चष्म्यातून पाहत आहे. जरांगे यांच्या आंदोलन व उपोषणामुळे मराठा समाज ज्यांना आरक्षण मिळालेले आहे त्यांना शत्रूच्या नजरेने पाहत आहे. आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी न्यायालयात दाद मागावी, असे निवेदनात म्हंटले आहे.


4 जून रोजी जरांगे यांनी पुन्हा उपोषणास बसणार असल्याचे जाहीर केलेले आहे. त्यांचे उपोषण राज्य सरकारने रोखावे, अन्यथा 5 जून रोजी त्यांचे उपोषण रोखण्यासाठी भिंगार येथील घासगल्लीत उपोषण करणार असल्याचे भिंगारदिवे यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *