• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

गर्भगिरी डोंगरातील पानवठ्यात टँकरने पाणी,

ByMirror

Apr 21, 2025
जय हिंद फाउंडेशनचा पशु-पक्षी व प्राण्यांना दिलासा!

जय हिंद फाउंडेशनचा पशु-पक्षी व प्राण्यांना दिलासा!

पशु-पक्ष्यांसाठी पाणवठा जीवनदायिनी ठरणार -भानुदास पालवे

नगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढत असताना, गर्भगिरी डोंगर परिसरातील पशु-पक्ष्यांच्या पाण्याच्या टंचाईपासून वाचविण्यासाठी जय हिंद फाउंडेशनच्या वतीने वन विभागाच्या पानवठ्यात टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, ही कृती जंगलातील प्राणीजीवनासाठी जीवनदायिनी ठरणार आहे.


वृक्षारोपणासह निसर्ग संवर्धनासाठी झटणाऱ्या जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. यावर्षी आगडगाव रस्त्यावरील कोल्हार घाट परिसरात, डोंगर व जंगल भागातील ठिकाणी ही पाण्याची सोय करण्यात आली.


या उपक्रमाचा शुभारंभ बोईसर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, अनिल गर्जे, रोहिदास पालवे, ऋषिकेश पालवे, वैभव पालवे, प्रसाद पालवे, मेजर सचिन पालवे, माजी उपसरपंच कारभारी गर्जे, आदेश पालवे, अनिल ससे यांच्यासह आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.


मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे म्हणाले की, जय हिंद फाउंडेशनचे कार्य हे निसर्ग संवर्धनाच्या दिशेने प्रेरणादायी आहे. त्यांचे वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. उन्हाळ्यात जंगलातील पशु-पक्ष्यांना पाण्याची टंचाई भासत असते. त्यामुळे हे पाणवठे त्यांच्या जगण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. जंगलातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासही अशा उपक्रमांचा मोठा फायदा होतो.


शिवाजी पालवे म्हणाले की, निसर्ग रक्षण ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. जय हिंद फाउंडेशनच्या या उपक्रमातून समाजात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होऊन भावी पिढीला निसर्गसंपन्न जीवनशैलीची प्रेरणा मिळेल. पशु-पक्ष्यांना पाण्याअभावी मृत्यू ओढवू नये, यासाठी आम्ही दरवर्षी हे अभियान राबवतो. प्रत्येकाने आपल्या घरी, अंगणात किंवा टेरेसवर पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवावे. यामार्फत आपणही या निसर्ग चळवळीचा भाग होऊ शकतो. तसेच, आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवस किंवा स्मृतिदिनानिमित्त जर कोणी पाण्याची सोय करु इच्छित असेल, तर त्यांनी फाउंडेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करुन, गरज पडल्यास अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.


मेजर सचिन पालवे यांनी सर्वांचे आभार मानत पुढील टप्प्यात अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *