• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

ByMirror

Jun 12, 2025
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क व परिसरात देशी झाडांची लागवड

मागील वर्षी लावलेल्या झाडांचे संवर्धन करुन पहिला वाढदिवस साजरा

नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क व परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. त्यांच्या समाजसेवेच्या आणि राजकीय कार्यकर्तृत्वाची स्मृती जपण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. तर मागील वर्षी लावलेल्या झाडांचे संवर्धन करुन त्यांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.


हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पर्यावरण संवर्धन सप्ताहानिमित्त मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याची मोहिम सुरु आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सदर वृक्षारोपण अभियानाचे प्रारंभ राजू लुनिया यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाले. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, राजेंद्र लुनिया, रमेश खंडेलवाल, सीए रवींद्र कटारिया, रमेश वराडे, जहीर सय्यद, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, अशोक लोंढे, दिलीप ठोकळ, अभिजीत सपकाळ, दीपकराव धाडगे, मनोहर दरवडे, रतन मेहेत्रे, दीपक अमृत, दिलीप गुगळे, अशोक पराते, सुधीर कपाळे, दीपकराव घोडके, अविनाश जाधव, अविनाश पोतदार, दीपकराव बडदे, शशिकांत पवार, विलास आहेर, दीपक मेहतानी, प्रकाश देवळालीकर, शेषराव पालवे, मुन्ना वाघस्कर, कोंडीराम वाघस्कर, निजाम पठाण, अनिल हळगावकर, रामनाथ गर्जे, अशोक दळवी, दशरथ मुंडे, प्रज्योत सागू, आसाराम बनसोडे, योगेश चौधरी, देविदास गंडाळ, सार्थक साठे, सिताराम परदेशी आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, मागील 25 वर्षापासून अविरतपणे ग्रुपचे सामाजिक कार्य सुरू आहे. आरोग्याप्रति जागरूक राहून दररोज सकाळी ग्रुपचे सदस्य योग प्राणायाम करतात. तर वृक्षरोपण व संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे कार्य सुरु आहे. ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांनी सर्व कार्यकर्त्यांना आधार देण्याचे काम केले. जिल्ह्याच्या राजकारण व समाजकारणातील एक अढळ नेतृत्व होते. त्यांनी आयुष्यभर समाजकारण करत कार्यकर्त्यांना बळ दिलं. ते केवळ एक नेते नव्हते, तर समाजासाठी समर्पित असलेली मायेची सावली होते. त्यांच्या आठवणींप्रमाणे हा वृक्ष अनेक पिढ्यांना सावली देईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


सचिन चोपडा म्हणाले की, प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपण व संवर्धन चळवळीत योगदान दिल्यास बदल घडणार आहे. निसर्गाचे आरोग्य सुधारण्यासाठी वृक्षरोपण काळाची गरज बनली आहे. भविष्यात पावसाचे प्रमाण कमी होत चालले असून, त्यामुळे वाढते तापमान, अवकाळी पाऊस, दुष्काळ परिस्थिती या नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक व्यक्तीने वृक्ष क्रांती चळवळीत सक्रीय झाल्यास ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्‍न सुटणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या अभियानातंर्गत मोठ्या प्रमाणात देशी झाडांची लागवड करण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *