• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात रंगला चर्मकारांचा गुणगौरव

ByMirror

Aug 27, 2024
शहरात रंगला चर्मकारांचा गुणगौरव

चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून व्यवसायासाठी युवकांना 30 लाख रुपये वितरीत

चर्मकार विकास संघाने समाजाला संघटित करुन विश्‍वास व आधार दिला -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाने सामाजिक चळवळीतून राज्यातील समाज संघटित केला. राज्यातील कानाकोपऱ्यात संघटनेचे कार्य पोहचले असून, लोकांना विश्‍वास देऊन त्यांना आधार देण्याचे काम केले जात आहे. तर मागील दहा वर्षापासून समाजातील गुणवंतांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन व ऊर्जा देण्याचे काम सुरु आहे. सातत्याने पाठपुरावा करुन शहरात एक एकर जागेत संत रविदास विकास केंद्र उभे राहत असून, त्याद्वारे समाजातील युवकांना दिशा देण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान चर्मकारांचा गुणगौरव सोहळ्यात आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, चर्मकार ऐक्य परिषदेचे मार्गदर्शक लक्ष्मणराव घुमरे, कार्याध्यक्ष डॉ. वसंतराव धाडवे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, सागर मुर्तुडकर, रोहित वाकचौरे, चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अमोल शिंदे, सर्जेराव गायकवाड, रामदास सोनवणे, कवि सुभाष सोनवणे, अरुण गाडेकर, सुरेश शेवाळे, महिला जिल्हाध्यक्षा रुक्मिणी नन्नवरे, संगिता वाकचौरे, दिनेश देवरे, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, अर्जुन वाघ, गोरख वाघमारे, संजय गुजर, मनिषा खामकर, अशोक आंबेडकर, अमोल शिंदे, पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय गवळी, भारत घोडके, मारुती लोंढे, अमोल शिंदे, बाळासाहेब सोनवणे, अमोल वाकचौरे आदींसह जिल्ह्यातील चर्मकार समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या चर्मकारांच्या गुणगौरव सोहळ्यात चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा आणि विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या युवक-युवती व समाजबांधवांचा गुणगौरव उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी महापुरुषांना अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडून आल्याबद्दल खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील 9 युवकांना व्यवसाय उभे करण्यासाठी तब्बल 30 लाख रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले.


खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, समाजाला न्याय मिळण्यासाठी वयाच्या सतराव्या वर्षापासून संघर्ष सुरू केला. आयुष्य प्रपंच विचार न करता समाजासाठी अहोरात्र काम केले चळवळ चालवली. समाजाला न्याय देण्याची भूमिका घेऊन काम केले. भविष्यातही समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी धावून येणार आहे. आपला माणूस म्हणून हक्काने हाक देण्याचे त्यांनी आवाहन केले. तर शहरात तीस वर्षे वास्तव्यचे व सामाजिक चळवळीत दिलेल्या योगदानाचे कथन केले. तर शिर्डीत संत रविदास विकास केंद्र उभारण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.


प्रास्ताविकात रामदास सोनवणे यांनी चर्मकार विकास संघाचे राज्यात सुरु असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन दरवर्षी वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून 500 ते 1000 लग्न निशुल्क जमवले जात आहे. मुला-मुलींच्या कल्याणासाठी हा उपक्रम सुरु असून, शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचे काम देखील सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


संजय खामकर म्हणाले की, मागील दहा वर्षापासून समाजातील गुणवंत व यशवंतांचा गौरव केला जात आहे. समाजातील युवक, उद्योजक, गटई कामगारांचे प्रश्‍न सोडवण्याचे काम सातत्याने आहे. राज्यात चांगले काम उभे करून समाज जोडण्याचे काम सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवनार येथे संत रविदास विकास केंद्राची भव्य 15 मजली इमारत बांधण्यासाठी मंजुरी देऊन मोठा निधी दिला. त्या धर्तीवर आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहरात संत रविदास विकास केंद्र उभारले जात आहे. त्याचप्रमाणे शिर्डीला देखील असे केंद्र समाज बांधवांसाठी उभारण्याची मागणी त्यांनी खासदार वाकचौरे यांच्याकडे केली. तर समाजाचा सन्मान राखून प्रश्‍न सोडवावे व समाजासाठी वेळ देण्याचे आवाहन केले.


लक्ष्मणराव घुमरे म्हणाले की, समाजाला न्याय देण्याची भूमिका चर्मकार विकास संघ बजावत आहे. समाज जागृक झाला तर हक्क मिळवता येणार असून, समाजाला जागृक करण्याचे काम अशा उपक्रमातून होत आहे. समाजाच्या उत्थानासाठी एकसंघपणे शक्ती उभी राहिल्यास समाजाचा वाटा मागता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. वसंतराव धाडवे यांनी शासनाच्या योजना समाजापर्यंत पोहचविण्याचे काम चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून होत आहे. समाजाच्या विकासासाठी सुरु असलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमासाठी रामदास सातपुते, संदीप सोनवणे, अर्जुन कांबळे, विनोद कांबळे, मनिष कांबळे, आण्णा खैरे, विठ्ठल देवरे, गणेश हनवते, बाबासाहेब दळवी, रुपेश लोखंडे, कारभारी देव्हारे, किरण घनदाट, संदीप डोळस, संतोष खैरे, किरण सोनवणे, अमोल डोळस, संतोष कांबळे, मनोज गवांदे, विकी कबाडे, दिलीप कांबळे, आकाश गायकवाड, बाळासाहेब गोळेकर, रंगनाथ कानडे, चांगदेव देवराय, निलेश आंबेडकर, सुरेखा देवरे, संतोष देवराय, गणेश एडके, संतोष कंगणकर, दिनेश तेलोरे, ऋषीकेश आंबेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कानडे यांनी केले. आभार सुभाष सोनवणे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *