• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रॅलीने वेधले लक्ष

ByMirror

Aug 11, 2024
शहरात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रॅलीने वेधले लक्ष

विश्‍व आदिवासी दिवस विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांनी साजरा

आदिवासी सेवा संघ व आदिवासी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- आदिवासी सेवा संघ व आदिवासी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने विश्‍व आदिवासी दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शुक्रवारी (दि. 9 आगॅस्ट) सकाळी शहरातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी युवक-युवतींनी आदिवासी समाजातील वेशभूषा परिधान करुन पारंपारिक नृत्याचे सादरीकरण केले. या रॅलीत सहभागी झालेल्या आदिवासी समाज बांधवांनी सर्वांचे लक्ष वेधले.


रॅलीत अकोले तालुक्यातील धामणवन व धाराचीवाडी येथील आदिवासी कलाकारांनी पारंपारिक आदिवासी बोहडा कला नृत्याचे सादरीकरण केले. टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयातून सकळी रॅलीला प्रारंभ झाले. यामध्ये आदिवासी वेशभूषेसह सहभागी झालेल्या समाजबांधवांनी लोकगीत सादर केले. बिरसा मुंडा यांच्या हुबेहुब वेशभूषेतील युवकाने सर्वांचे लक्ष वेधले. वाडियापार्क, माळीवाडा वेस, माळीवाडा बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्वास्तीक चौक मार्गे पुन्हा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रॅलीचा समारोप झाला.


आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.प्रसंगी मा.भाग्यश्री पाटिल व आमदार संग्राम भैय्या यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व निसर्गाचे प्रतिक वक्षाची पुजा करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील, ॲड. विक्रम वाडेकर, पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर सोलापुर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. नितीन तळपाडे, प्राचार्या डॉ. माहेश्‍वरी वीरसिंग गावीत उपस्थित होते.


आदिवासी समाजात निस्वार्थ सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींना अदिम पुरस्काराने गौरविण्यात आले. तर आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सेवानिवृत्त कमर्चाऱ्यांचा सपत्निक सन्मान देखील पार पडले. आदिवासी समाज काल, आज आणि उदया या विषयावर योगशे सारोक्ते यांनी मार्गदर्शन केले.


आमदार संग्राम जगताप यांनी आदिवासी बांधवांसाठी शहरात आदिवासी भवन उभारण्याचे आश्‍वासन देऊन आदिवासी समाजातील युवक-युवती व विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार राहणार असल्याचे स्पष्ट केले.
न्यायाधीश भाग्यश्री पाटील म्हणाल्या की, आदिवासी बांधवांनी कायद्याचे आकलन करुन आपले प्रश्‍न सोडवावेत. महिलांनी सरकारच्या लाडकी बहिण, आयुष्यमान आरोग्य योजना आदी कल्याणकारी योजनांचा फायदा घ्यावा. आदिवासी समाजाची संस्कृती इतरांसाठी आदर्श व दिशादर्शक आहे. हा समाज निसर्गाचे जतन व संवर्धन करत पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारा समुह असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमासाठी कवीराज बोटे, शिवानंद भांगरे, भरत साबळे, के.के. जाधव, हिरामण पोपेरे, महेश शेळके, सोनवणे, हनुमंता, विलास भारमल, संतोष नवले आदींसह मोठ्यासंख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी जिल्हा रुग्णालय व आनंद जनरल हॉस्पिटलच्या वतीने आदिवासी समाज बांधवांची डॉ. कल्पना रणवरे व डॉ.बी.एन रणवरे यांनी आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कोरडे व संजय साबळे यांनी केले. आभार जगन्नाथ सावळे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *