जंतर-मंतर आंदोलनाला अहिल्यानगरचा पाठिंबा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, 31 जुलैला महामोर्चाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र आणि सकारात्मक बदल घडवून आणणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करणे तसेच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) संदर्भातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत अहिल्यानगरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी आंदोलनात सहभागी युवक-युवतींवर केलेल्या कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
सामाजिक कार्यकर्ते सुशांत म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक-युवती, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान सहभागी नागरिकांच्या हातात तिरंगा ध्वज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंह यांच्या प्रतिमा होत्या. “मोदी सरकार चले जाव”, “हमे चाहिए आजादी” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. युवकांनी डफाच्या तालावर गीत सादर करत घोषणाबाजी केली. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे फलकही झळकविण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट (National Eligibility Entrance Test) परीक्षेचा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणामुळे देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर अनेक संघटनांनी आंदोलन केले. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीच्या जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
या आंदोलनाला पाठिंबा म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक, नेहा बोरा, दानिश ली, मनीष सिंग यांच्यासह अनेक विद्यार्थी अन्नत्याग उपोषण करत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. हे आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू असून उपोषणाच्या 21व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा तसेच त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
शांततापूर्ण आणि संविधानाच्या चौकटीत सुरू असलेल्या आंदोलनावर दडपशाही करण्यात आल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला दडपण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय न झाल्यास येत्या 31 जुलै 2026 रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

