शास्त्र शाखेचा 100 टक्के निकाल; रचेत काबरा व तनिष्का मुथा अव्वल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च 2026 च्या बारावी (एचएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने उल्लेखनीय यश संपादन करत शास्त्र शाखेचा 100 टक्के तर वाणिज्य शाखेचा 98.11 टक्के निकाल नोंदविला आहे. या उत्कृष्ट निकालामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
निकालात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संस्थेच्या वतीने उत्साहात पार पडला. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, विश्वस्त ॲड. गौरव मिरीकर, मुख्याध्यापक कैलास साबळे, उपमुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी, पर्यवेक्षक रेणुका परदेशी, नंदू जाधव, निलीमा शिंदे, शिक्षकवृंद, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शास्त्र शाखेत रचेत रविकांत काबरा याने 82.33 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. नक्षत्रा विजय शिंदे हिने 79.33 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर गौरव विजय भुकन याने 77.22 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. काजल सुशील शिंगवी हिने 73.67 टक्के गुणांसह चौथा क्रमांक मिळवला असून शताक्षी जयंत कुलकर्णी हिने 73.50 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक प्राप्त केला.
वाणिज्य शाखेत तनिष्का भरत मुथा हिने 88.33 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांकावर नाव कोरले. अंकिता दिनानाथ ठाकूर हिने 84.67 टक्के गुणांसह द्वितीय, आदेश मनोज लुणिया याने 83.67 टक्के गुणांसह तृतीय, त्रिशा अजय गंगावाल हिने 80.50 टक्के गुणांसह चौथा, तर हिमांशु कुशल विजन याने 79.17 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया तसेच सहकार्यवाह गौरव फिरोदिया यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ असून, भविष्यातही त्यांनी उच्च शिक्षणात आणि विविध क्षेत्रांत यश संपादन करुन भावी आयुष्यात यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

