• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

लोककल्याणाचा मार्ग म्हणून लोकभज्ञाक-कारण स्वीकारण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार

ByMirror

Apr 19, 2024

नागरिकांमध्ये करणार जागृती; अध्यात्म, समाजकारण आणि राजकारणाची संयुक्त प्रक्रिया

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतात सुरू असलेल्या राजकारण व धर्म यांच्या भयानक संकरित वाणाला पर्याय देण्यासाठी अध्यात्म, समाजकारण आणि राजकारण या तिघांमधून नवीन वाण तयार करून लोककल्याणाचा मार्ग म्हणून लोकभज्ञाक-कारण स्वीकारण्यास नागरिकांमध्ये जागृतीसाठी पीपल्स हेल्पलाईनने पुढाकार घेतला असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


लोकभज्ञाक-कारणची माहिती नसल्याने देशात भ्रष्टाचाराचे पेव फुटले आहे. ज्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरू केला ते भ्रष्टाचारामध्ये बुडाले आहेत. त्याच वेळेला धर्माच्या नावावर राजकारण करून सत्ता आणि भ्रष्टाचार देशभर सुरू आहे. सामाजिक संघटनांना गणपती मंडळापेक्षा सरकार महत्त्व देत नाही. जनतेला राजकारणात पर्याय हवा आहे. पर्याय मिळत नसल्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ या मार्गाचा जनता वापर करीत आहे. यापूर्वी भक्ती, ज्ञान आणि कर्म अध्यात्मामध्ये सातत्याने वापरण्यात आले. परंतु जनार्धनाची भक्ती करण्याऐवजी जनता जनार्धन हे सूत्र ठेवून संपूर्ण देशातील जनतेचे कल्याण करणे शक्य आहे. त्यामुळेच लोकभज्ञाक-कारण राबविण्याचे पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


देशातील लोक हे जनता जनार्धनाचे स्वरूप आहे. अशा जनता जनार्धनांची भक्ती म्हणजे या जनता जनार्धनाचे कल्याण करण्याची मनापासूनची इच्छा त्यासाठी जनतेच्या प्रश्‍नांची पूर्ण जाणीव आणि असे प्रश्‍न सोडवण्याचे ज्ञान म्हणजे ज्ञानमार्ग ठरणार आहे. तर देशातील जनता जनार्धनासाठी निरंतर कार्य करणे, हा कर्ममार्ग ठरणार आहे. यापूर्वी अध्यात्माच्या नावाखाली अनेकांनी हिमालयाच्या गुहेत आत्मार्पण केले. त्याचा समाजाला काहीएक फायदा दिसला नाही. परंतु विश्‍वातील चैतन्य हे फक्त सजीवामध्येच कार्यरत असते आणि सर्व सजीवांचे कल्याण करण्याचा जवळचा मार्ग म्हणजे लोकांनी लोकशाहीच्या मार्गाने सर्व प्रश्‍न सोडविले पाहिजे. गरीबी झोपडपट्टया, शिक्षणाचा अभाव, बेकारी, बेरोजगारी गुन्हेगारी त्याशिवाय पर्यावरणाचे प्रश्‍न आणि सर्वात मोठा ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्‍न या सर्व गोष्टी फक्त लोकभज्ञाक-कारणच्या माध्यमातून सुटणार असल्याची अपेक्षा ॲड. गवळी यांनी व्यक्त केली आहे.


पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने जनतेसमोर लोकभज्ञाक पक्षाची स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याबाबतचा निर्णय ॲड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंभे, विठ्ठल सुरम, ओम कदम, अशोक भोसले इत्यादींनी केला आहे. तातडीने लोकप्रतिनिधी उमेदवार ठरविण्या ऐवजी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लोकभज्ञाक-कारण करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे जय शिवाजी, जय डिच्चूकावा मंत्राचा प्रचार प्रसार करण्यात येणार आहे. यापुढे समाजकारण करण्याबरोबरच अध्यात्म आणि राजकारण संकलित करून लोकांची भक्ती, लोकांच्या प्रश्‍नाचे ज्ञान आणि सोडवण्याची शक्ती प्राप्त करणे आणि लोकांसाठी कार्य करणे या तंत्राच्या पक्षाच्या माध्यमातून वापर करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *