गुंडगिरी व अवैध धंद्यामुळे कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण
अवैध धंदे चालविणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची उद्योजकांची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- आमीच्या पुढाकारातून शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत उद्योजकांनी गुंडगिरी व अवैध धंदे बंद होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. गुन्हेगारीचे केंद्र बनत चाललेल्या अवैध धंदे चालविणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी देखील उद्योजकांनी लावून धरली.
एमआयडीसीमध्ये अवैध धंदे चालविणारे अनाधिकृत टपऱ्या वाढल्या असताना गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या टपऱ्यांमध्ये दारू, चरस, गांजा, अफू असे अमली पदार्थ विकले जातात. त्याचे सेवन करून गुन्हेगारीचे प्रमाण या परिसरात वाढत आहे. या सर्वांमुळे एमआयडीसी मधील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील गंभीर झाला असल्याचे उद्योजकांनी स्पष्ट केले.
एमआयडीसीत कंपन्यातून चोऱ्यांच्या घटना सर्रासपणे घडत आहे. विशेषतः बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये वारंवार चोऱ्या होत असून, नुकतेच कामावरून परतणाऱ्या तीन कामगारांना रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एमआयडीसीसाठी दोन गावांच्या ग्रामपंचायती आहेत. त्यांचा मालमत्ता कर वेगवेगळ्या तीन गाव मिळून करत असताना एकच मालमत्ता कर लागू करावा.
एमआयडीसीसाठी एमएसईबीचे सबस्टेशन मंजूर आहे. परंतु जागे अभावी सबस्टेशन होत नाही. त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी.सनफार्मा चौक ते निबळक बायपास रस्त्याची खूप दुरावस्था झाली असून, तो रस्ता दुरुस्त करावा. अपघात टाळण्यासाठी सनफार्मा चौकामधील सिग्नल चालू करावेत, एमआयडीसी मध्ये अंतर्गत (ब्लॉक) प्रमाणे बस सेवा चालू करण्याची मागणी आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी केली.
आमी संघटनेच्या सर्व प्रश्न जाणून घेतल्यानंतर आमदार जगताप यांनी तात्काळ एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना फोन लावून सर्व घटनेची विचारपूस केली. तर सर्व अवैध धंदे तात्काळ बंद होण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तसेच एमएसईबी अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून एमएसईबीचे सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे सांगितले. तर एमआयडीसीमध्ये कोणतीही घटना घडल्यास व काही अडीअडचणी निर्माण झाल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे सांगून उद्योजकांना त्यांनी धीर दिला.
या बैठकीसाठी उद्योजकांच्या आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, संजय बंदिष्टी,राजेंद्र कटारिया, सुमित लोढा, रवींद्र बक्षी,सतीश गवळी , सागर निंबाळकर, आकाश जोशी, दीपक नागरगोजे, सचिन पाठक, प्रफुल्ल पारख,आदी उपस्थित होते.