महाराणा प्रताप यांचे जीवन हे शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे सर्वोच्च उदाहरण -आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रगौरव, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेमाचे प्रतीक असलेले वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची 486 वी जयंती अहिल्यानगरमध्ये ‘राजपूत समाज सेवा संस्था’च्या वतीने भव्य उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. अहिल्यानगरमधील राजपूत समाज या जयंती सोहळ्यानिमित्त एकत्र आले होते.
प्रारंभी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष इंजिनिअर रोहनसिंह परदेशी यांनी उपस्थितांचे स्वागत करत म्हणाले, महाराणा प्रताप हे शौर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेमाचे सर्वोच्च प्रतीक आहेत. त्यांचे जीवन तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. आज आपण त्यांचा आदर करत त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी एकत्र आलो आहोत.
या जयंती सोहळ्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्रसिंह चौहान,सचिव मोहनसिंह ठाकूर, खजिनदार विशालसिंह परदेशी, तसेच सदस्य किसनसिंह परदेशी, चेतनसिंह परदेशी, अमितसिंह परदेशी, कुंदन परदेशी, यशसिंह ठाकूर, भाऊ परदेशी, अमोल ठाकूर, हर्षल परदेशी, किशोरसिंह परदेशी, संग्रामसिंह परदेशी, किशोरसिंह राजपूत, प्रतापसिंह परदेशी, ईश्वरसिंह परदेशी, परीक्षितसिंह ठाकूर, सचिन परदेशी, अमित चंदेले, प्रसाद परदेशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष योगदान दिले.
जयंती उत्सवानिमित्त राजपूत समाज सेवा संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर विविध सामाजिक उपक्रम यांच्यासह पारंपरिक संगीत, नृत्य व राजपूत समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. महाराणा प्रतापांच्या शौर्याची आठवण देणारी मिरवणुक देखील उत्साहात पार पडली. इतिहासावर आधारित भाषणे व प्रेरक व्याख्याने झाली. उपस्थित समाजबांधवांनी पारंपरिक राजपूत खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, महाराणा प्रताप यांचे जीवन हे शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे सर्वोच्च उदाहरण आहे. त्यांच्या विचारातून युवकांनी समाज आणि राष्ट्रहितासाठी कार्य करावे. अशा महापुरुषांच्या जयंती उत्सवांमुळे इतिहास जिवंत राहतो आणि नव्या पिढीला दिशा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
