विद्यार्थ्यांच्या भाषणांनी व ग्रामपंचायत कार्यालयात जय भीमच्या गजराने अभिवादन
शिक्षण, संघटन आणि संघर्ष हाच प्रगतीचा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला -पै. नाना डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवनाथ विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ तसेच धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नवनाथ विद्यालयात पार पडलेल्या मुख्य कार्यक्रमाला मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, शरद भोस, मंदा साळवे, स्वाती इथापे, तृप्ती वाघमारे, आप्पासाहेब कदम, तुकाराम पवार, रेखा जरे, निकिता रासकर-शिंदे, दिपाली ठाणगे-म्हस्के, तेजस केदारी, प्रमोद थिटे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमाला ग्रामपंचायत अधिकारी प्रविण पानसंबळ, सागर कापसे, बाळासाहेब बोडखे, अरुण कापसे, किरण जाधव, संदीप गायकवाड, अतुल फलके, दीपक जाधव, दादा गायकवाड, सोमनाथ आतकर, ॲड. विजय केदार, संभाजी पाचारणे, बबलू गायकवाड, अरुण काळे, भरत बोडखे, संदीप डोंगरे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी रिदा अन्सार शेख हिने शाळेला भारतीय संविधानाची प्रत भेट दिले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समान हक्क प्राप्त झाले आहेत. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचे केवळ पूजन न करता ते प्रत्यक्ष जीवनात उतरवणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण, संघटन आणि संघर्ष हा त्यांचा संदेश समाजाने अंगीकारल्यासच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक उत्तम कांडेकर म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्थान होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. संविधान हे देशाचे आधारस्तंभ असून त्यातील मूल्ये जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आदर्श नागरिक बनण्याचे त्यांनी सांगितले.
