समर्थ प्रशालेत सोशल मीडिया प्रशिक्षण संपन्न
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “तंत्रज्ञान व चॅट जीपीटीचे युग आहे. शिक्षकांनी याचा अचूक व चपखल वापर केल्यास अध्ययन-अध्यापन समृद्ध होऊ शकते.ए आयच्या काळामध्ये विविध टूल वापरून आपण शिक्षणाचा आलेख उंचावू शकतो. त्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे खजिनदार व समर्थरत्न माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांनी केले.
सावेडीच्या श्री समर्थ प्रशालेच्या समर्थ सभागृहात श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने संस्थेच्या चारही शाळांतील सर्व शिक्षकांसाठी तंत्रस्नेही सोशल मीडिया प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी कुलकर्णी बोलत होते.
याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, सचिव सुरेश क्षीरसागर, कार्यकारणी सदस्या संध्या कुलकर्णी, प्राचार्या तथा मुख्याध्यापिका वसुधा जोशी, मुख्याध्यापिका धनश्री गुंफेकर, मुख्याध्यापक सुनील कानडे, पर्यवेक्षक एल.एम. कुलकर्णी, सोशल मीडिया टीम हेड ऋग्वेद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते समर्थ पूजन संपन्न झाल्यानंतर प्रास्ताविकात वसुधा जोशी यांनी सोशल मीडियातील तंत्रज्ञान शिक्षण व कौशल्यांचे महत्त्व विशद केले.
प्रशिक्षणामध्ये संजय कुलकर्णी यांनी पीपीटी प्रेझेंटेशनमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम ,व्हाट्सअप व अन्य गतिमान सोशल मीडिया ॲपची माहिती प्रत्यक्षिकासह प्रस्तुत केली. गुगल प्ले स्टोअर वरील शिक्षकांसाठी महत्त्वाचे असलेले विविध ॲप्स शिक्षकांना प्रात्यक्षिकाद्वारे मोबाईल मध्ये डाउनलोड करून त्याची कार्यवाही देखील लगेचच सुरू झाली. ऋग्वेद कुलकर्णी यांनी चॅट जीपीटी, गुगल डॉक्युमेंट, युट्युब, जी बोर्ड यांची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.
फोटो- व्हिडिओ एडिटिंग, चॅट जीपीटीचा वापर, AR व VR बॉक्सचे महत्त्व, शिक्षकांसाठी महत्त्वाचे असणारे ॲप्स याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार विजेते तंत्रस्नेही शिक्षक डॉ. अमोल बागुल यांनी माहिती दिली.
क्षीरसागर यांनी विशद केले की “आपल्याकडे असलेला मोबाईलचा सकारात्मक पुरेपूर वापर करून आपण विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञानसंपदा निश्चितच देऊ शकतो.”
श्रीपाद कुलकर्णी यांनी नमूद केले की “मोबाईलद्वारे सोशल मीडियाचा वापर करताना तारतम्य बाळगतानाच त्यातील शिक्षण क्षेत्रासाठी हवे ते मोजके शोधून व हेरून आपणअसे ई-शैक्षणिक साहित्य शाळेच्या व्यासपीठावर निश्चितच आणले पाहिजे.”
प्रश्नोत्तर सत्रामध्ये शिक्षकांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.स्वागत एल. एम. कुलकर्णी यांनी केले तर आभार धनश्री गुंफेकर यांनी मानले.
