अखंड हरिनाम सप्ताहात रामजन्मोत्सव साजरा
भक्तीमय वातावरणात रंगला रामजन्म सोहळा; महिलांनी पाळणा हलवून केले स्वागत
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे श्रीराम नवमीचा पवित्र उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव मोठ्या श्रद्धेने पार पडला. गेली सलग 39 वर्षे ही परंपरा कायम राखत दरवर्षी सप्ताहादरम्यान रामजन्मोत्सव साजरा झाला.
श्री नवनाथ महाराज मंदिरात हा धार्मिक सोहळा पार पडला. मंदिर परिसरात रामनामाच्या गजराने वातावरण भारावून गेले होते. महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून प्रभू श्रीरामांच्या जन्माचे स्वागत केले. त्याचबरोबर भक्तीगीत, अभंग व भजनांच्या सादरीकरणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. या सोहळ्यात आशाबाई ठाणगे, वीना बोडखे, कमल शिंदे, सुनीता डोंगरे, अनिता खांदवे, मंदा खळदकर, लता फलके, सुमन ठाणगे आदी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, भागचंद जाधव, प्रशांत जाधव, एकनाथ डोंगरे, नामदेव फलके, एकनाथ धायतडक, गोरख फलके गुरुजी, सखाराम फलके, ज्ञानदेव जाधव, अतुल फलके, मारुती फलके आदी मान्यवर उपस्थित होते.
ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर यांनी सांगितले की, “प्रभू श्रीरामांचा जन्म हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून तो धर्म, नीती, आदर्श आणि कर्तव्यपरायणतेचा संदेश देणारा दिवस आहे. श्रीरामांनी आपल्या आयुष्यात सत्य, संयम, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा यांचे पालन केले. आजच्या काळात प्रत्येकाने त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याची गरज आहे.
राम म्हणजे मर्यादा, राम म्हणजे कर्तव्य, आणि राम म्हणजे समाजासाठी जगण्याची प्रेरणा. आपण सर्वांनी आपल्या जीवनात रामाचे गुण आत्मसात केले, तर समाजात आपोआप सद्भावना, शांती आणि एकता निर्माण होईल.
