• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरातील आनंदनगर परिसरात रंगला भोंडल्याचा पारंपरिक उत्सव

ByMirror

Sep 30, 2025
शहरातील आनंदनगर परिसरात रंगला भोंडल्याचा पारंपरिक उत्सव

आनंदनगरात आदिशक्ती महिला मंडळाचा पुढाकार; कार्यक्रमातून महिला शक्तीचा जागर


महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा जतन करण्याचा प्रयत्न

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने भोंडलाचा पारंपरिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील पारंपारिक संस्कृतीची ओळख जपण्यासाठी आणि महिलांमध्ये एकोपा वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या आरतीने करण्यात आली. नटून-थटून पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक गाणी, नृत्य, विनोदी खेळ, तसेच संवादाच्या माध्यमातून भोंडल्याला रंगत आणली. या प्रसंगी महिलांनी देवीची आराधना करून नवरात्रीचे महत्त्व अधोरेखित केले.


भोंडला हा महाराष्ट्रातील एक जुना व पारंपारिक सण असून, यामध्ये महिलांना एकत्र येऊन आपली मते मांडण्याची, संस्कृतीचे जतन करण्याची आणि समाजात आपली भूमिका अधोरेखित करण्याची संधी मिळते. आदिशक्ती महिला मंडळाने हा कार्यक्रम आयोजित करून परिसरातील महिलांना एकत्र आणले.


या कार्यक्रमात मंगल पवार, मोनिका लालबागे, धनश्री गुजर, स्मिता कटारिया, कमल लालबागे, प्रिया लालबागे, नेहा लालबागे, पूजा चौधरी, मोहिनी शिंदे, रवीशा इथापे, सुनीता मुनोत, लता मुथा, प्राजक्ता नगरकर, लता बोरुडे, सुनिता हुलावळे, रेखा सस्तारे, विजया म्हस्के, राधा भगत, सविता लोखंडे, उमा क्षीरसागर, संगिता कावरे, रचना पवार, गीता भागानगरे, उर्मिला गुजर आदींसह परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


मोनिका लालबागे म्हणाल्या की, आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपले सण हे केवळ आनंदाचे क्षण नसून समाजाला एकत्र आणण्याचे, विचारांची देवाणघेवाण करण्याचे साधन आहेत. भोंडला हा कार्यक्रम महिलांना स्वतःला व्यक्त करण्याची, आपले विचार मांडण्याची एक संधी मिळते. आजच्या धावपळीच्या युगात आपले पारंपरिक सण आणि परंपरा जपणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.


मंगल पवार म्हणाल्या की, आपली संस्कृती हाच आपला वारसा आहे. महिला जर एकत्र आल्या तर कोणतेही कार्य अशक्य राहणार नाही. महिला समाजातील कणा असून, त्यांच्या विचारातून संस्कृती टिकून आहे. नव्या पिढीला परंपरेची ओळख करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *