आनंद विद्यालय परिसरात 55 झाडांची लागवड
हिरवळ हीच खरी शाळेची शोभा -प्रा. बाबासाहेब गीते
नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने चिचोंडी येथील आनंद विद्यालय (आनंदनगर) परिसरात 55 झाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी या झाडाच्या संवर्धनाची जबाबदारी स्विकारली.
निवृत्त प्राध्यापक बाबासाहेब गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत या वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ झाला. या उपक्रमाला बाजार समितीचे संचालक वैभव खलाटे, सरपंच श्रीकांत आटकर, माजी सरपंच बाबाजी पालवे, विद्यालयाचे प्राचार्य दिलावर फकीर, पर्यवेक्षक संजय शिंदे, बिपिन खंडागळे, सागर गुंदेचा, राजेंद्र सोनवणे, संतोष वाघ, देविदास पालवे, लक्ष्मण बोरुडे, विशाल एकम, सतिष दरवडे, बाळासाहेब तुपे, प्रकाश गरड, रोहीदास देवगुणे, अभय जावळे, राजेंद्र बोरूडे, बाबासाहेब आव्हाड, जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, ॲड. संदीप जावळे, राजू आव्हाड, महादेव गर्जे, राजू गिते, रमेश पाथरकर, भास्कर पालवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रा. बाबासाहेब गीते म्हणाले की, जय हिंद फाऊंडेशनने घेतलेली ही मोहीम अत्यंत कौतुकास्पद आहे. आज प्रत्येक डोंगररांग हिरवीगार व्हावी, प्रत्येक गाव आणि शाळा हिरवाईने सुशोभित व्हावी, यासाठी अशी मोहिम सातत्याने राबवली जाणे गरजेचे आहे. हिरवाईमुळे वातावरण शुद्ध राहते, जलस्रोत टिकून राहतात आणि पुढील पिढ्यांना निरोगी आयुष्य लाभते. जिल्ह्यातील अनेक मंदिर परिसरातही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले असून त्यांचे संवर्धन उत्तमपणे सुरु आहे. आनंद विद्यालयातील झाडे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या जबाबदारीतून निश्चितच हिरवीगार वाढतील. हिरवळ हीच खरी शाळेची शोभा असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी पालवे म्हणाले की, वृक्ष म्हणजे जीवनाची शाश्वत हमी आहे. महाराष्ट्राचे राज्यपुष्प असलेले ताम्हण वृक्ष आपल्या गावोगावी, शाळा-परिसरात लावले गेले तर ते राज्याची ओळख आणि अभिमान ठरेल. विद्यार्थ्यांना ताम्हण वृक्षाची ओळख करून देणे म्हणजे संस्कृतीची आणि पर्यावरणाची जपणूक करणे होय. प्रत्येक गावाने, प्रत्येक शाळेने या उपक्रमात सहभागी होऊन किमान एक ताम्हण वृक्ष तरी लावण्याचे त्यांनी आवाहन केले.
शालेय परिसरात 15 वड, 15 पिंपळ, 10 ताम्हण-कदंब, 10 सोनचाफा आणि 5 इतर देशी जातीची झाडे लावण्यात आली. वृक्षारोपण म्हणजे फक्त झाड लावणे नव्हे, तर त्याचे संवर्धन करणे ही खरी जबाबदारी असल्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. वृक्षारोपण उपक्रमासाठी गणेश जंगम, शशी पालवे, अशोक आव्हाड, महादेव गर्जे, सोन्याबापु गोरे, संदीप जावळे, विष्णू गीते यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन माजी सैनिक शिवाजी गर्जे यांनी केले.
