संस्थेच्या प्रांगणात देशी वृक्षांची लागवड
नगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कृष्णाली फाउंडेशन आणि ग्रामीण विकास व अध्ययन केंद्र समाजकार्य आणि संशोधन संस्था, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या प्रांगणात देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत जांभुळ, कांचन, आवळा, चिंच, कृष्णकमळ अशा देशी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी कृष्णाली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत शेळके पाटील, तसेच ग्रामीण विकास व अध्ययन केंद्राचे अतिथी प्राध्यापक जयेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी युवा शास्त्रज्ञ व जैवविविधता संशोधक रणजित राऊत यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.
रणजित राऊत म्हणाले की, सतत वाढणारे शहरीकरण, जंगलतोड व प्रदूषण यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाने वृक्षारोपण, पाण्याचा जपून वापर व जैवविविधतेचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ सरकारचीच नव्हे तर आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. संस्थेचे स्वयंसेवक, विद्यार्थी व प्राध्यापकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वृक्षारोपण अभियानात सहभाग नोंदवला.