सोलापूर येथे मान्यवरांच्य हस्ते गौरव; गावाची विकासात्मक वाटचाल व सामाजिक कार्याची दखल
नगर (प्रतिनिधी)- हिंगणगाव (ता. नगर) येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषदचे (मुंबई) राज्य कोअर कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अहिल्यादेवी फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न गौरव या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सोनवणे यांना मा. आमदार प्रकाश अण्णा शेडगे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आयकर आयुक्त (पुणे) डॉ. नितीन वाघमोडे, आयकर आयुक्त (मुंबई) डॉ. सचिन मोटे, सहाय्यक पोलीस आयुक्त (पुणे) रुक्मिणीताई गलांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडूरले, मिसेस इंडिया श्वेता परदेशी, वक्ते प्रा.डॉ. यशपाल हिंगे, रिल स्टार प्राजक्ता मालुंजकर, फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गोरड, कार्याध्यक्ष महादेव महानोर आदी मान्यवर उपस्थित होते.
सोनवणे यांनी हिंगणगावच्या पहिल्या महिला सरपंच सौ. स्मिता (काकी) सोनवणे, उद्योजक जयंतराव नलावडे, मुकुंद दुबे, प्रा. सूरश्री सोनवणे, विद्याताई मोटे, अण्णा पाटील, शालिवाहन कोळेकर, तुकाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार स्विकारला.
आबासाहेब सोनवणे यांनी गेल्या 25 वर्षे पंचायत राज व्यवस्था मध्ये सरपंच व सदस्य म्हणून काम पाहिले आहे. कृषी, जलसंधारण, पंचायत राज व्यवस्था बळकटीकरण, दुष्काळी गावाची ओळख पुसून पाणीदार हिंगणगाव ओळख निर्माण केल्याचे कार्य त्यांनी केले आहे.
गावाशी जोडणारे सर्व रस्ते मजबुतीकरण, डांबरीकरण करुन शेतपानंद शिवार रस्ते मुक्त करून वहिवाटीस खुले करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पेयजल योजना राबवणे, गावातील प्राथमिक शाळा खोल्यांचे आरसीसी बांधकाम, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, पशुवैद्यकीय दवाखाना इमारत, सुसज्ज असे अमरधाम, वृक्षारोपण आदी विकासात्मक व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. कोरोना काळात झोकून काम करून आरोग्याच्या सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. सांगली सातारा पूरग्रस्तांना मदत आदी त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.