समाजाला दिशादर्शक असलेले बाबासाहेबांचे विचार म्हणजे क्रांतीची जननी -एन.एम. पवळे
नगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषदेत त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, राज्य उपाध्यक्ष वसंतराव थोरात, अतिरिक्त महासचिव सुहास धीवर, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे, बाळासाहेब शिंदे, दादासाहेब शिंदे, सिकंदर वाकरे, निखिल पठारे, श्याम गोडळकर, श्याम थोरात, समीर वाघमारे, गडदे, विनायक गोंडाळ, सुधा जाधव, धरती गायकवाड, सोमनाथ शिंगाडे आदींसह कास्ट्राईबचे पदाधिकारी व कर्मचारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याध्यक्ष एन.एम. पवळे म्हणाले की, भारतीय लोकांना समता बंधुता मिळवून देणारी राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. राज्यघटनेमुळे देशात समता, बंधुता नांदत आहे. बाबासाहेबांनी अन्याया विरोधात दिलेला लढा कायम स्फूर्ती देणारा आहे. त्यांचे विचार आजही समाजाला दिशादर्शक असून, हे विचार क्रांतीची जननी असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष के.के. जाधव यांनी तत्कालीन व्यवस्थेविरोधात संघर्ष करून बाबासाहेबांनी दीन-दलितांचा उद्धार केला. शोषितांचा आवाज बुलंद करुन जातिव्यवस्थेने बरबटलेल्या काळोखात बाबासाहेबांनी समाजाला प्रकाशवाट दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले.
