ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दिंडीचे मार्गक्रमण
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) गावात आषाढी एकादशीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांची दिंडी उत्साहात पार पडली. नवनाथ विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भक्तीमय वातावरणात दिंडीचे मार्गक्रमण झाले.

ज्ञानोबा… तुकाराम… च्या जयघोषाने गावातील परिसर निनादला. मुली व मुलांनी वारकऱ्यांची पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. हातात टाळ घेऊन विद्यार्थ्यांनी जय हरी विठ्ठलाचा घोष केला. दिंडी पाहण्यासाठी पालक व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. तर मुली व शिक्षिकांनी फुगड्यांचा फेर धरला होता. शाळेच्या मैदानात रिंगण सोहळा पार पडला.
ठिकठिकाणी ग्रामस्थांनी बाल वारकरींचे स्वागत करुन कौतुक केले. तर स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने दिंडीचे स्वागत करुन बाल वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शालेय परिसरात वृक्षारोपण करुन पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.

बालदिंडीसाठी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, वसंत फलके, गोरख चौरे, प्रमोद थिटे, अमोल वाबळे, मंदा साळवे, तृप्ती वाघमारे, मयुरी जाधव, बाळासाहेब कोतकर, अशोक फलके, भानुदास लंगोटे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, मंदाताई डोंगरे आदींसह शालेय शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
