• Tue. Jul 22nd, 2025

केडगावात सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरची रंगली शिवजयंतीची मिरवणुक

ByMirror

Feb 21, 2024

100 मावळ्यांसह घोडेस्वार, भगवे ध्वज व शिवकालीन वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग

शिवरायांची पालखी ठरली आकर्षण

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांची मिरवणुक रंगली होती. छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, सईबाई, अफजलखान, तानाजी प्रभू, श्रीराम, लक्ष्मण, सीता, 100 मावळे, घोडेस्वार, भगवे ध्वज व शिवकालीन वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. शिवरायांची पालखी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली. यावेळी विद्यार्थ्यांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. या मिरवणुकीने केडगाव परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.


ही मिरवणूक केडगाव देवी रोड मार्गे काढण्यात आली. मिरवणूकी दरम्यान ज्ञानसाधना क्लासचे संस्थापक प्रसाद जमदाडे यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच केडगाव येथील ग्रामस्थांनी मिरवणुकीच्या वेळी ठीक-ठिकाणी छत्रपतींच्या पालखीचे स्वागत केले. मिरवणूक अंबिका नगर बस स्टॉप या ठिकाणी पोहोचल्यानंतर बालाजी कॉलनी व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने शिवरायांची महाआरती करुन विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी खड्या आवाज मध्ये शिवरायांचे पोवाडे सादर करुन शिवरायांच्या जीवनावर पथनाट्य सादर केले. अफजल खान वध, लेझीम खेळ, व सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी रंगला होता. हा शिवजयंती उत्सव पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप भोर यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सर्वांना समान न्याय व समतेची वागणूक दिली. शिवाजी महाराजांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्याकडे संघटन कौशल्य, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, महिलांना सन्मान, बुद्धीचातुर्य, युद्धपारंगत असे अष्टपैलू गुण होते.

रयतेचे राज्य खऱ्या अर्थाने महाराजांनी निर्माण केले. महाराज पराक्रमी धाडसी असे रयतेचे राजे होते. त्यांनी पराक्रमाने अशक्य असे स्वराज्याचे स्वप्न साकारले. महाराजांना बालवयातच राजमाता जिजाऊंनी चांगले संस्कार व शिकवण देऊन त्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली होती. महाराजांनी प्रजेवर अन्याय होऊ दिला नाही, ते सर्वांना समान न्याय, सर्वधर्मसमभाव, स्त्रियांप्रती आदरभाव या प्रमाणे वागले. आजच्या पिढीने त्यांचा आदर्श घेऊन समाजात कार्य करण्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी राजेंद्र शिंदे, माजी सभापती मनोज कोतकर, उद्योजक जालिंदर कोतकर, दीपक लोंढे, बालीशेठ बांगरे, बच्चनशेठ कोतकर, सोनू घेंबुड, भुषण गुंड, विजय कराळे, पिंटू लगड, संतोष लोंढे, सुमित लोंढे, भाऊसाहेब काकडे, प्रकाश चंगेडिया, सोमनाथ बनकर, राजीव लोंढे, गणेश जाधव, सचिन पोखरणा, अतुल दरंदले, गजू पाटील, संदीप दिघे, अक्षय खिलारी, राजू शिंगी, राजू कोलते, प्रमिला कार्ले, अविनाश साठे, शिवाजी मगर, धनंजय शिंदे आदींसह विद्यालयातील शिक्षिका उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *