• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रा

ByMirror

Feb 5, 2023

अभिवादन मेळाव्यातून रविदास महाराजांच्या विचारांचा जागर

कर्मकांडाला थारा न देता, संत रविदासांनी समाजाला सत्याची जाणीव करून दिली -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- चमत्कार, कर्मकांडाला थारा न देता संत गुरु रविदास महाराजांनी समाजाला सत्याची जाणीव करून दिली. सध्या समाजात वेगळ्या भूमिका मांडून वेगळे पेरण्याचे काम केले जात आहे. या सामाजिक संघटना संत, महात्म्यांचे खरे विचार समाजापर्यंत पोहचवून समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे. संत गुरु रविदास महाराजांच्या समतेच्या विचारांची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


चर्मकार संघर्ष समिती, राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार समाजातील विविध संघटनांच्या वतीने शहरात शोभा यात्रा काढून संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. तर अभिवादन मेळाव्यात संत रविदास महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते. चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सुनिल त्र्यंबके, भारुडकार हमीद सय्यद, नीलेश बांगरे, विशाल बेलपवार, बाबासाहेब तेलोरे, शोभाताई कानडे, बाळासाहेब केदारे, कैलास गांगर्डे, लताताई नेटके, अभिनव सूर्यवंशी, महेश आहेर, दिनेश परदेशी, सचिन वाघमारे, अरूणाताई गोयल, सिंधुताई कटके, आप्पासाहेब केदारे, ज्ञानेश्‍वर म्हैसमाळे, प्रितीश सुर्यवंशी, सुभाष झरेकर, नंदकुमार गायकवाड, विश्‍वनाथ निर्वाण, बाबासाहेब लोहकरे, रोहिदास उदमले, बापूसाहेब देवरे, कारभारी चिंधे, बाळकृष्ण जगताप, मीनाताई गायकवाड, प्रतिभाताई धस, शशिकला झरेकर, विद्याताई वाघ, वंदना गायकवाड आदींसह समाजबांधव, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, संत, महात्म्यांचा खरा विचार कृतीतून भावी पिढीला द्यावा लागणार आहे. संत रविदासांनी कर्मकांड बाजूला सारुन माणुसकीचा संदेश दिला. त्यांच्या विचाराने समाजाला दिशा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवाजी साळवे व प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते अभिवादन करुन संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बॅण्ड पथकासह निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला सहभागी झाल्या होत्या. रथात संत रविदास महाराजांचे तैलचित्र मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शहरातील प्रमुख चौकातून शोभायात्रेचे मार्गक्रमण झाले. महिलांनी फुगड्यांचा फेर, तर युवकांनी भक्तीगीतांच्या तालावर ठेका धरला होता. शोभा यात्रेचे शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात समारोप होऊन अभिवादन मेळाव्याची सुरुवात संत रविदास महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली.


शिवाजी साळवे म्हणाले की, भगवान गौतम बुध्दांचा खरा वारसा संत रविदासांनी समाजाला आपल्या विचारातून दिला. ते चमत्कारी संत नव्हते, त्यांनी आयुष्यात कर्मकांडाला थारा न देता अनिष्ट रुढी, परंपरा व अंधश्रद्धे विरोधात बंड केला. समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी साडेसहाशे वर्षांपूर्वी त्यांनी माणुसकीचा सर्व धर्म व समाजाला प्रेम, भक्तीचा विचार दिला. त्यांच्या विचाराने चर्मकार समाज इतरांना प्रेम देत असल्याचे त्यांनी सांगितले.


राजेंद्र बुंदेले यांनी चौदाव्या शतकात कर्मकांड, अंधश्रध्दा, अज्ञान, भिती व गुलामगिरीत जोखडलेल्या समाजाला संत गुरु रविदास महाराजांनी प्रकाश वाट दाखवली. निर्भीडपणे समानता व मानवतेचा संदेश देऊन, ही क्रांतीकारी चळवळ अतिशय आत्मविश्‍वासाने रविदास महाराजानी चालविली. त्यांनी माणसामधील द्वेष व भेदभाव नष्ट करण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.


हमीद सय्यद यांनी अंधश्रध्दे प्रहार करणारे भारुड सादर केले. यावेळी समाजात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणार्‍यांना व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत खरात यांनी केले. आभार विशाल बेलपवार यांनी मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *