• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

विधवांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शहरात आदिशक्ती महिला फाऊंडेशनची स्थापना

ByMirror

Jul 13, 2022

विधवा महिलांच्या रोजगारासह इतर प्रश्‍न सोडविण्यासाठी एकवटल्या महिला

समाजात विधवा महिलांचे प्रश्‍न गंभीर -अनुरीता झगडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- विधवा महिलांचे पुनर्वसन, रोजगार व त्यांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी शहरात आदिशक्ती महिला फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. पाईपलाईन रोड शिवनगर येथे फाऊंडेशनच्या फलकाचे अनावरण भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या राज्याध्यक्षा अनुरीता झगडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, आदिशक्ती महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा जयाताई पालवे, उपाध्यक्षा अलका आव्हाड, सचिव ज्योती भांड, खजिनदार मेघा वरखेडकर, सहसचिव जयश्री माने उपस्थित होत्या.


अनुरीता झगडे म्हणाल्या की, समाजात विधवा महिलांचे प्रश्‍न गंभीर बनत आहे. गावोगावी विधवा प्रथा बंदीचे ठराव होत असताना, त्यांच्या पुनर्वसन व इतर प्रश्‍नांकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील विधवा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी फाऊंडेशनच्या महिलांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. महिला महिलांच्या कल्याण व विकासासाठी पुढे आल्यास क्रांतिकारक बदल घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.


फाउंडेशनच्या अध्यक्षा जयाताई पालवे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष विधवा महिलांना मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. हे फाऊंडेशन विधवा महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ असणार आहे. विधवा महिलांच्या रोजगारासह इतर प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्व विधवांना एकत्र आनण्याचे कार्य सुरु आहे. त्यांच्या न्याय, हक्कासाठी लढा उभारला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाजी पालवे म्हणाले की, विधवा महिलांच्या मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून मदत मिळू शकते. संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यास अनेक प्रश्‍न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमासाठी फाऊंडेशनच्या सदस्या सुनिता शिंदे, अंजली भवर, सगुणा भोसले, आश्‍विनी शिवसागर, दिपीका जावळे, वैशाली कुलकर्णी, रजनी ब्राम्हे, सुनिता पालवे, नंदिनी पालवे, प्रलया चकाले, मंदा बारहाते, अनिता जरे, गायत्री भांबड, सुनिता गायकवाड, अर्चना सरोदे, सविता बडे, नंदा वखारे, आशाबाई गुडे, सुनिता इंगावले, सगुणा भोसले, सुनिता आमले, तारामती मरकड, शुभदा चांदवडकर, शालिनी पुडे, उषा डेमाले, लीला फुंदे, संगीता फुंदे, नंदिनी पालवे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित विधवा महिलांनी समाजात सन्मानाने जगण्यासाठी सहानुभूतीपेक्षा आधार व प्रेमाची साथ देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *