वनविभागाच्या पाणवठ्यामध्ये टँकरने सोडले पाणी; प्रभाकरम फाउंडेशनचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्याच्या तीव्र झळा वाढत असताना जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभाकरम फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत चास येथील वनविभागाच्या पाणवठ्यामध्ये टँकरद्वारे पाणी सोडण्याचा उपक्रम राबविला. दरवर्षीप्रमाणे यंदाही फाउंडेशनकडून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात आला.
फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संबंधित पाणवठ्याची पाहणी करून टँकरच्या माध्यमातून पाणी सोडले. यामुळे बिबटे, हरिण, ससा, कोल्हा, माकड तसेच विविध पशु-पक्ष्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्याअभावी वन्यप्राण्यांना मानवी वसाहतीकडे वळण्याची वेळ येऊ नये आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित राहावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विपुल तापकीर, उपाध्यक्ष अभिषेक थोरात, सौरभ गावखरे आदी उपस्थित होते.
