गावाच्या फाट्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- बायजाबाई जेऊर (ता. नगर) येथे अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत बुध्द पौर्णिमेला अखेर 75 फुटी भीमध्वज उत्साहात फडकविण्यात आला. गावाच्या फाट्यावर जेऊरगट येथील भीमसैनिकांच्या वतीने हा ध्वज उभारण्यात आला असून, या चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरण करुन फलकाचे अनावरणही करण्यात आले.
शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन तर स्थानिक महिलांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरण फलकाचे अनावरण झाले. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथा (भाऊ) आल्हाट, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश (भाऊ) सोनवणे, मयूर मकासरे, सुनील सोनवणे, अशोक जावळे, किरण पाटोळे, सुनिल पाटोळे, अजय पाटोळे, रविंद्र सोनवणे, सखाराम पाटोळे, रामदास साळवे, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटोळे, अजय नरवडे, विकास सोनवणे, निलेश गायकवाड, महेश पाटोळे, तुकाराम पाटोळे, अतुल जावळे, संतोष पाटोळे, अनिकेत साठे आदींसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अल्ताफ सय्यद म्हणाले की, गावाच्या एकोप्यासाठी सर्वांनी ध्वजाचा वाद सामंजस्याने सोडविला. सर्व एकोप्याने राहत असून, भीम सैनिकांच्या पुढाकाराने गावाच्या वेशी समोर ध्वज उभारण्यात आला आहे. गौतम बुध्दांनी दिलेल्या शिकवणीचे आचरण करीत हा सोहळा शांततेत पार पडला. सर्वांनी सहकार्याची भूमिका दाखविल्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले.
प्रा. अजय पाटोळे यांनी जेऊर गाव आंबेडकरी व बुध्द चळवळीचा बालेकिल्ला असून, भीम सैनिकांनी ही चळवळ बहरण्यासाठी व प्रेरणा मिळण्यासाठी ध्वज उभारण्यात आला असल्याचे स्पष्ट केले. सुनिल पाटोळे यांनी उपस्थित ग्रामस्थांना बुध्द पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

गावाच्या फाट्यावर भीमध्वज उभारण्यावरुन वाद निर्माण झाला होता. ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांची बैठक होऊन वादावर पडदा टाकून एकजुटीने हा ध्वज उभारण्याचा निर्णय झाला होता. बुध्द पौर्णिमेला ध्वजरोहण होताच भीमसैनिकांनी हात उंचावून एकच जल्लोष करुन जय भीमचा गजर केला. शांततेत हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. गावाची यात्रा व भीम ध्वज अनावरण एकाचवेळी असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त हजर होता.