• Wed. Jan 21st, 2026

लंगर सेवेच्या अन्न छत्रालयाची वर्षपूर्ती

ByMirror

Jul 20, 2023

गरजूंना मिष्टान्न भोजनाचे पाकिट वितरीत

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व तब्बल तीन वर्ष भूकेलेल्यांना जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयाची वर्ष पूर्ती झाली. या अन्न छत्रालयाच्या माध्यमातून गरजूंना संध्याकाळी एक वेळचे जेवण उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


कोरोना प्रादुर्भाव संपल्यानंतर गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून लंगर सेवा अविरतपणे सुरु राहण्यासाठी व शहरातील गरजूंना संध्याकाळचे जेवण मिळण्यासाठी हे अन्न छत्रालय सुरु करण्यात आलेले आहे. वर्ष पूर्तीनिमित्त गरजूंना मिष्टान्न भोजनाच्या पाकिटसह हरमनकौर वधवा यांनी बनविलेल्या केकचे देखील वाटप करण्यात आले. यावेळी जनक आहूजा, प्रीतपालसिंह धुप्पड, हरजीतसिंह वधवा, मनोज मदान, प्रशांत मुनोत, राजेंद्र कंत्रोड, गुलशन कंत्रोड, सतीश गंभीर, डॉ. संजय असनानी, अनिश आहूजा, जतिन आहूजा, राजा नारंग, अर्जुन मदान, राजू जग्गी, किशोर रंगलानी, रामसिंह कथूरिया, किशोर कंत्रोड, दलजीतसिंह वधवा, सोमनाथ चिंतामणी, समित दीपनायक, सुनील थोरात, प्रमोद पंतम, रवि सचदेव आदी सेवादार उपस्थित होते.


जनक आहूजा म्हणाले की, घर घर लंगर सेवेच्या वतीने कोरोनाच्या टाळेबंदीपासून शहरातील लाखो गरजू घटकांना दोन वेळचे अन्न देऊन त्यांची भूक भागविण्यात आली. लंगर सेवेच्या अन्न छत्रालयात अवघ्या 10 रुपयात एका व्यक्तीला पोटभर जेवणाचे फुड पॅकेट दिले जात आहेत. तर वेळप्रसंगी गरजूंना मोफतही देण्यात येतात. लंगर सेवेचा लाभ गरजू घटकांना मिळण्यासाठी ही सेवा देणगीदारांच्या सहकार्याने अविरतपणे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


हरजितसिंह वधवा म्हणाले की, लंगर सेवेच्या माध्यमातून सर्व सेवादार जोडले गेले असून, इतरही सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या सेवेची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. रात्री कोणीही उपाशी पोटी झोपू नये, हाच एकमेव उद्देश ठेऊन सेवा दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *