• Fri. Jul 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

गर्दीत नकळत गळून पडलेले महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे दागिने केले परत

ByMirror

Jul 31, 2026
मोहन औटींच्या प्रामाणिकपणाचा गौरव; सोन्यापेक्षा मौल्यवान ठरला प्रामाणिकपणा

मोहन औटींच्या प्रामाणिकपणाचा गौरव; सोन्यापेक्षा मौल्यवान ठरला प्रामाणिकपणा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पैश्‍यापेक्षा माणुसकी आणि प्रामाणिकपणा अधिक मोठा असतो, याचा प्रत्यय केडगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित महाप्रसाद सोहळ्यात आला. मोहिनी नगर येथील साई मंदिरात हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असताना एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण गर्दीत नकळत गळून पडले.


काही वेळाने गंठण हरवल्याचे लक्षात येताच त्या महिलेने मंदिर परिसरात शोधाशोध सुरू केली. अमूल्य दागिना हरवल्याने ती भावूक झाली होती. परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. महाप्रसाद वाटपाची सेवा बजावत असलेले साईभक्त मोहन (मामा) औटी यांच्या नजरेस ते सोन्याचे गंठण पडले. कोणताही मोह न बाळगता त्यांनी तत्काळ आयोजकांकडे जाऊन गंठण जमा केले आणि ध्वनिक्षेपकावरून ज्यांचे गंठण हरवले आहे त्यांनी ओळख पटवून ते घेऊन जावे, असे आवाहन करण्यास सांगितले.


घोषणा ऐकताच संबंधित महिला धावत आली. योग्य ओळख पटविल्यानंतर मोहन औटी यांनी तिच्या हाती सुरक्षितपणे सोन्याचे गंठण सुपूर्द केले. हरवलेली अमूल्य वस्तू परत मिळाल्याच्या आनंदाने त्या महिलेच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तिने मोहन औटी यांचे मनापासून आभार व्यक्त केले. मोहन औटी यांच्या प्रामाणिकपणाचे साई सेवा मंडळ तसेच केडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांच्या प्रामाणिक व सेवाभावी वृत्तीचा गौरव करण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *