जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा आदेश
तक्रारदाराला मिळाला न्याय
नगर (प्रतिनिधी)- जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. सदर कंपनीला 23 लाख 60 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे व त्यावर 9% व्याज देण्याचे निर्देश दिले आहे.
31 मार्च 2023 रोजी शेतात काम करणाऱ्या जळालेल्या जेसीबी पोकलँड मशीनच्या नुकसानाची भरपाई तक्रारदार महेश लक्ष्मण एकाड (रा. खांडवी, ता. कर्जत) यांच्या वतीने विमा कंपनीकडून मागणी करण्यात आली होती. परंतु विमा कंपनीने त्यांची मागणी नाकारली होती. यावरून तक्रारदारांनी न्याय मंचामध्ये तक्रार दाखल केली, ज्यात ॲड. गजेंद्र पिसाळ यांनी त्यांच्या बाजूने सक्षमपणे बाजू मांडली.
अर्जदारावर झालेला अन्याय कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याने न्यायमंचाने संपूर्ण कागदपत्रांची बारकाईने पाहणी व अवलोकन करून कोर्टाने विमा कंपनीच्या नुकसान भरपाई न देण्याच्या कारणांना नाकारले आणि तक्रारदार महेश लक्ष्मण यांना 23 लाख 60 हजार रुपये नुकसान भरपाई, 9% व्याज तसेच मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी 17,000 रुपये देण्याचे आदेश दिले. या निर्णयाने तक्रारदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सदर अर्जाच्या गुणदोशावर जिल्हा तक्रार निवारण आयोग अध्यक्षा श्रीमती प्रज्ञा हेन्द्रे आणि सदस्या चारु डोंगरे व संध्या कसबे यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात तक्रारदार यांच्या वतीने ॲड. गजेंद्र पिसाळ यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. अच्युत भिसे, ॲड. विशाल पांडुळे, आणि ॲड. निखिल चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
