अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे 17 मे रोजी उपोषण
अंतिम यादी तपासून चौकशी व्हावी व यामधील दोषींवर कारवाई करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पोलीस भरतीची लेखी परीक्षा अपात्र उमेदवाराने दिली असताना याप्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रकरणी पाठपुरावा करुन देखील कारवाई होत नसल्याने, 17 मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे. तर पोलीस भरतीमध्ये नियम, अटी, शर्तीचे उल्लंघन झाले असून, जबाबदार अधिकारींनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलीस भरतीमध्ये कागदपत्रांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता याची पडताळणी न करता अथवा जाणून बुजून पडताळणी अधिकारी याने त्रुटी असताना देखील अर्ज मंजुर केलेले आहे. याप्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एका महिला पोलीस कर्मचारीला वयाची अट अपूर्ण असल्याने अपात्र ठरविले होते. या उमेदवाराने पुन्हा 2023 मध्ये लेखी परीक्षेला उपस्थित राहून परीक्षा दिली आहे.
दुसर्या प्रकरणात पोलीस महासंचालकांच्या आदेशाने एका उमेदवाराला एकाच जिल्ह्याच्या ठिकाणी अर्ज भरण्याची अट होती. मात्र अनेक उमेदवारांनी मोबाईल क्रमांक व मेल आयडी बदलून दोन-दोन ठिकाणी भरतीचे अर्ज दाखल केलेले आहेत. एका उमेदवाराने दोन ठिकाणी अर्ज केले असेल तर, अशा उमेदवाराचा अर्ज बाद ठरविणे आवश्यक होते. मात्र तशी कोणतीही कारवाई न करता या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा करण्यात आलेला आहे किंवा जाणून बुजून त्यांना सुट देण्यात आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अंतिम यादी तपासून चौकशी करावी व यामधील दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.