• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

मराठी पत्रकार परिषदेचे 7 एप्रिलला कर्जतला पत्रकारांचा राज्यस्तरीय मेळावा

ByMirror

Mar 30, 2023

ज्येष्ठ संपादक संजय राऊत प्रमुख पाहुणे, आमदार रोहित पवार स्वागताध्यक्ष

आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाला जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे राज्यातील तालुका पत्रकार संघांचा राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका व जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा 7 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संपादक तथा खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. सकाळी आकरा वाजता मेळाव्याचे उद्घाटन होणार असून, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आहेत, अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.


यासंबंधी अधिक माहिती देताना एस.एम. देशमुख म्हणाले की, मराठी पत्रकार परिषदेचा राज्यातील तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय मेळावा कर्जत (जि. अहमदनगर) येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या अद्ययावत शारदाबाई पवार सभागृहात होणार आहे. मेळाव्यासाठी राज्यभरातील सर्व तालुक्यांतील मिळून सुमारे पाचशे पत्रकार उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची कर्जत-जामखेडमधील नियोजन समितीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे. या मेळाव्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या तालुका आणि जिल्हा संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा आण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाचा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाला जाहीर करण्यात आला आहे.

कर्जतमधील पत्रकार गणेश जेवरे, आशिष बोरा, योगेश गांगर्डे, भाऊसाहेब तोरडमल, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, अस्लम पठाण, जामखेडचे पत्रकार अविनाश बोधले, सुदाम वराट, अशोक वीर, किरण रेडे, पप्पूभई सय्यद यांच्यासह सर्व स्थानिक पत्रकार तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी यासाठी परिश्रम घेत आहेत. राज्यभारातील साधारण आठशेपेक्षा अधिक पत्रकार उपस्थित राहतील. मराठी पत्रकार परिषदेच्या प्रयत्नातून पत्रकार हल्ला विरोधी कायदा झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरचे पत्रकार शशिकांत वारिसे यांना परिषदेच्या लढ्यातून न्याय देता आला. मात्र सध्या पत्रकारावर हल्ले, खोटे गुन्हे दाखल करण्याचा ट्रेंड आला आहे, पत्रकारांचे प्रश्‍न सोडवण्याची सरकारची मानसिकता दिसत नाही. पत्रकारावर सातत्याने अन्याय होतोय. पत्रकाराचा आवाज दाबला जात आहे. पेन्शनबाबत जाचक अटी काढाव्यात या सर्व बाबीवर चर्चा केली जाणार आहे असे एस. एम. देशमुख यांनी सांगितले.

परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूरभाई शेख, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, विठ्ठल लांडगे आदी उपस्थित होते. परिषदेचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी प्रस्तावीक केले. अफताब शेख यांनी आभार मानले. कर्जत येथील मेळाव्याला तालुका, जिल्हाध्यक्ष तसेच अन्य पदाधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरचिटणीस मन्सुरभाई शेख, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैदय यांच्यासह संघटनेच्या राज्य आणि जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी केले आहे.

डिजीटललाच चांगले भविष्य

एस. एम. देशमुख म्हणाले, बहुतांश मोठी माध्यमे भांडवलदाराकडे गेली आहेत. त्यामुळे डिजीटललाच चांगले भविष्य आहे. मात्र डिजीटललाच विश्‍वासार्हता जपली पाहिजे. डिजीटलला मान्यता मिळावी यासाठी पत्रकार परिषद सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. सरकारने पुरस्कार योजना सुरू केली असून, सरकार जाहिरातीही देत आहेत. मराठी पत्रकार परिषद पुण्यात मे महिन्यात प्रशिक्षण शिबीर घेणार आहोत. राज्यात साडेपाच हजार डिजीटल चॅनल असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदाचे पुरस्काराचे मानकरी तालुके पुढील प्रमाणे:-

नागपूर विभाग: मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा, अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती, लातूर विभाग : औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली, नाशिक विभाग: अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव, पुणे विभाग : पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे, कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली, औरंगाबाद विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ जिल्हा औरंगाबाद, कोकण विभाग: महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *