• Wed. Nov 5th, 2025

केंद्रीय अर्थसंकल्प लोकविरोधी, विकासविरोधी व अवास्तव..!

ByMirror

Feb 1, 2023

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा आरोप

बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात पूर्णपणे दुर्लक्ष -कॉ. सुभाष लांडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्राचा अर्थसंकल्प वाढती बेरोजगारी, वाढती असमानता, महागाई आणि उदयोन्मुख बहुआयामी ग्रामीण संकटाची दखल घेण्यात अपयशी ठरला आहे. या अर्थसंकल्पाने अर्थव्यवस्थेच्या वास्तवाकडे दुर्लक्ष केले आहे, अशी प्रखर टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाने आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर केली आहे.


बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे यांनी केली आहे. अर्थव्यवस्थेत सर्व काही ठीक आहे. ही धारणा दृढ करण्याचा केविलवाणा प्रयत्य या अर्थसंकल्पाने करत, केंद्र सरकारने लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रयत्न केला असल्याचे पक्षाने भूमिका स्पष्ट केली आहे.


अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, मनरेगा, अन्न सुरक्षा आणि इतर सामाजिक क्षेत्रांसाठी केलेली तरतूद पूर्णपणे अपुरी आहे. तसेच कष्टकरी जनतेला मोठ्या असुरक्षिततेकडे ढकलून, त्यांना उपासमार आणि विध्वंसाकडे नेणारा तो एक मोठा धक्का असेल, अशी भितीही भारतीय कम्युनिस्ट पक्षाने व्यक्त केली आहे.


सरकारने शेतीवरील तरतूद 8500 कोटी रुपयांनी कमी केली आहे. एमएसएमईएस वर भांडवली सबसिडी स्पष्ट नाही. अन्नधान्यावरील अनुदान 2.8 लाख कोटींवरुन कमी करत, ते आता 1.97 लाख कोटी करण्यात आले आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी 2022-23 या वर्षासाठी 89,000 कोटी रुपयांची तरतूद होती, परंतु आता ती कमी करण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प लोकविरोधी, विकासविरोधी व अवास्तव आहे, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली असल्याची माहिती कॉ. लांडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *