तिरंगा ध्वज देऊन कार्याचा गौरव
कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारीने पर्यावरण संवर्धनासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद -शिवाजी पालवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धन मोहिम राबविणार्या माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनने महाराष्ट्र शासनाचे वृक्षमित्र व पुणे शहर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांचा गौरव केला. चव्हाण यांनी वृक्षरोपण चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याला सलाम करुन त्यांना तिरंगा ध्वज सन्मानपुर्वक प्रदान करुन सत्कार करण्यात आला. यावेळी जय हिंदचे शिवाजी पालवे, महादेव शिरसाट, कृष्णा काकडे आदी उपस्थित होते.
शिवाजी पालवे म्हणाले की, नामदेव चव्हाण हे आयपीएस अधिकारी असून सध्या पुणे शहर पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत आहे. महाराष्ट्र शासनाचे वृक्ष मित्र म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जालना, औरंगाबाद, पुणे व इतर अनेक ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जवळपास दोन लाखाहून अधिक वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे काम करण्यात आले. त्यांचे कार्य समाजाला दिशादर्शक आहे. एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी उच्च पदावर काम करताना सामाजिक भावनेने पर्यावरण संवर्धनासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
कृष्णा काकडे यांनी महाराष्ट्र राज्यात पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष चळवळ उभी केली. महाराष्ट्र राज्यातील अनेक वृक्ष मित्रांना त्यांनी या मोहिमेत सहभागी करुन घेतले. वृक्षरोपण चळवळीमध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट केले.

सत्काराला उत्तर देताना पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण म्हणाले की, देश रक्षणासाठी पुढे सरसावलेल्या हातांनी पर्यावरण रक्षणाचे संरक्षण अभिमानास्पद असून, ही एक देश सेवाच आहे. मनुष्याच्या भावी पिढीसाठी झाडे ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणावर मनुष्याचे जीवन सुखी व आनंदी होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईला वृक्षरोपणासाठी साद घातली जात असून, तरुणांचा या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात महाराष्ट्रातील गावे, डोंगर, पर्वत रांगा हिरवाईने नटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जय हिंद फाउंडेशनच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यामध्ये वृक्ष चळवळ उभी करुन, मोठ्या प्रमाणात गावो-गावी, मंदिर परिसर, गड, डोंगर, देवस्थान, शाळा अशा विविध ठिकाणी सुरु असलेल्या वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची माहिती देण्यात आली. आभार महादेव शिरसाट यांनी मानले.
