माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी उभी केलेली चळवळ दिशादर्शक -नामदेव जावळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाभर सुरु असलेल्या वृक्षरोपण अभियानातंर्गत कोल्हार (ता. पाथर्डी) येथील उदरमल घाटात वृक्षारोपण करण्यात आले.
हनुमान मंदिर परिसर व मावलया मंदिर परिसरात चिंच, करंज, वड आदी झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी ह.भ.प. ढवळेताई, निवृत्त मुख्याध्यापक नामदेव जावळे, प्रगतशील शेतकरी संतोष पालवे, वन विभागाचे संजय पालवे, राम चव्हाण, महादेव दारकुंडे, अशोक जगदाळे, नामदेव पालवे, पांडूरंग पालवे, दत्तात्रय पालवे, विकास पालवे, शरद पालवे, चंदू नेटके, रामा नेटके, चंदू पालवे, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे आदी उपस्थित होते.

निवृत्त मुख्याध्यापक नामदेव जावळे म्हणाले की, पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली असून, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण आवश्यक आहे. माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी उभी केलेली चळवळ दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
दत्तात्रय गडाख यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकव शहीद परिवारांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले जात असून, जय हिंदने सामाजिक वसा जपल्याचे त्यांनी सांगितले. ह.भ.प. ढवळेताई यांनी येणार्या काळात मंदिर परिसर हिरावाईने फुलणार असल्याचे सांगून, मंदिर परिसरामध्ये लावलेल्या सर्व झाडे जगविणार असल्याचे आश्वासन दिले. आभार माजी सैनिक शिवाजी गर्जे यांनी मानले.

