डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन
शिक्षण, संघटन आणि संघर्ष ही बाबासाहेबांची त्रिसूत्री सामाजिक परिवर्तनाची नांदी -प्रकाश थोरात
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत त्यांच्या तत्वांचा अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
उपस्थितांनी “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. तर देशात सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला. प्रकाश थोरात, इंजि. अनिल घाटविसावे, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, प्रथमेश घाटविसावे, आशिष घाटविसावे, सुनील घाटविसावे, प्रियंका निकाळजे, श्वेता गायकवाड, संतोष गायकवाड, सदानंद गायकवाड, सोहम गायकवाड, तन्वी गायकवाड, संजय देवढे, निजाम जहागीरदार, अण्णा लसगरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकाश थोरात म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला मानवी मूलभूत अधिकार प्रदान करून सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समतेची भक्कम पायाभरणी केली. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी नवभारताची उभारणी करत प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे संरक्षण दिले. त्यांनी दिलेले शिक्षण, संघटन आणि संघर्ष हे त्रिसूत्री आजही तितकेच महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांच्या या दूरदृष्टीमुळेच आज देशात लोकशाही मूल्ये रुजली असून सर्व समाजघटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे; त्यामुळे त्यांच्या विचारांचे जतन आणि आचरण करणे हेच खरे त्यांना अभिवादन ठरेल.
