“प्रश्नमंजुषा, भिमगीत आणि प्रेरणादायी विचारांनी रंगला कार्यक्रम”
157 देशांमध्ये साजरी होणारी बाबासाहेबांची जयंती प्रत्येक भारतीयांचा अभिमान -राजेंद्र चोंगड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात व जल्लोषात कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रश्नमंजुषा, भिमगीते आणि प्रेरणादायी भाषणांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
कार्यक्रमाची सुरुवात बीएसएनएलचे महाप्रबंधक राजेंद्र चोंगड, डेप्युटी जनरल मॅनेजर विश्वनाथ वाघ, एससी-एसटी वेल्फेअर असोसिएशनचे मुख्य सल्लागार प्रदीपकुमार जाधव, डीजीएम फायनान्स झोळे साहेब, सेवा बीएसएनएलचे सचिव गजेंद्र पिसे आणि प्रशासकीय अधिकारी राहुल मोरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमासाठी गणेश जोशी, भावसार, अनंतरे, पिंपरकर, सोमनाथ जगताप, विश्वनाथ वाघ, झोळे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाप्रबंधक राजेंद्र चोंगड यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांचे विचार आजही जागतिक स्तरावर प्रभावी असल्याचे नमूद केले. त्यांनी विशेषतः सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगातील सुमारे 157 देशांमध्ये साजरी केली जाते, ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.
प्रदीपकुमार जाधव म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा संदेश आजही समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांमुळे वंचित, शोषित घटकांना न्याय मिळाला आणि देशात मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन घडून आले. बाबासाहेबांचे जीवन हे संघर्ष, जिद्द आणि शिक्षणाची प्रेरणा देणारे आहे. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन जगासमोर एक आदर्श निर्माण केला. त्यामुळे प्रत्येकाने त्यांच्या विचारांचा अंगीकार करून आपल्या जीवनात आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे आवश्यक आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत बीएसएनएल कर्मचारी अशोक पारधे यांची कन्या आर्या हिने “कुणी नाय केलं भलं ओ माय माझ्या भीमाने केलं” तसेच “व्हीआयपी राहणं” ही भिमगीते सादर करून उपस्थितांना भावूक केले. शिर्डी येथील कर्मचारी पवार यांनीही भिमगीत सादर करत कार्यक्रमात रंग भरला. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रदीपकुमार जाधव यांनी घेतली. या स्पर्धेला कर्मचारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अचूक उत्तरे देणाऱ्यांना तत्काळ बक्षिसे देण्यात आल्याने कार्यक्रम अधिक उत्साहवर्धक ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पिसे यांनी केले. आभार प्रशासकीय अधिकारी राहुल मोरे यांनी मानले. या प्रसंगी प्रविण सोनवणे, घोडके, कुलकर्णी, बांबेरे, प्रशांत मेहेरा, जोगदंड, गुप्ता, मोरे मॅडम, विजय उबाळे आदी मान्यवर तसेच बीएसएनएलचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
