विद्यार्थ्यांची राज्यात चमकदार कामगिरी
देवांश जाधव, आराध्या जाधव व श्रेया मरकड राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकले
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने लक्ष्यवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी राज्य आणि जिल्हा पातळीवर उज्वल कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले आहे.
इयत्ता पहिलीतील देवांश महेश जाधव याने राज्यात सहावा क्रमांक पटकावला. इयत्ता दुसरीतील आराध्या सोमनाथ जाधव हिने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. त्याच इयत्तेतील श्रेया संजय मरकड हिने राज्यात अकरावा व जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवला, तर कु. अंजली नवनाथ मळेकर हिने राज्यात पंधरावा व जिल्ह्यात आठवा क्रमांक पटकावला. इयत्ता तिसरीतील कु. लावण्या राजू बोरगे हिने राज्यात एकोणिसावा व जिल्ह्यात बारावा क्रमांक मिळवला. कु. स्वरा समीर कुलकर्णी हिने चौतीसावा व जिल्ह्यात चोवीसावा क्रमांक मिळवला.
इयत्ता चौथीतील कार्तिक अतुल सोनवणे याने राज्यात तिसावा व जिल्ह्यात तेवीसावा क्रमांक मिळवला, तर चि. श्लोक संजय मरकड याने राज्यात पंचेचाळीसावा व जिल्ह्यात अडोतीसावा क्रमांक मिळवला. इयत्ता पाचवीतील चि. आयुष बाबासाहेब पडळकर याने राज्यात तेहतीसावा व जिल्ह्यात सहवीसावा क्रमांक मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक संदिप भोर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद तसेच पालकांनी कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
