राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने सत्कार
लवकरच अहिल्यानगरमध्ये भव्य नागरी सत्काराचे आयोजन -सुनील साळवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहिल्यानगरच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना. आठवले यांचे अभिनंदन केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, शिवाजीराव साळवे, गणेश कदम, दीपकराव गायकवाड, भीमराज बागुल, करण कोळगे, माणिक यादव, लाभन पगारे, बापू जावळे, गणेश साळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वाढत्या संघटनाबाबत माहिती दिली. सध्या पक्षाला दोन राज्यात मान्यता मिळाली असून, अजून दोन राज्यात पक्षाला मान्यता मिळाल्यास रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल. त्यासाठी दोन-तीन वर्षे देशभरातील व विशेषत: महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.
पक्षाचा विस्तार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळात झोकून देऊन काम करावे. सत्तेत राहून समाजातील विविध प्रश्न सोडविण्याचे काम केले जात आहे. समाजातील वंचित, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचेही ना. आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल ना. आठवले यांचा अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने लवकरच भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
