शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना निरोप
विद्यार्थी दशेत टाकलेला प्रत्येक पाऊल भविष्याचे भवितव्य घडविणारा -बाबासाहेब बोडखे
नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाच्या परीक्षेसाठी व भावी शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यालयातील इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक परिषदचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शालेय संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजी विधाते, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, माध्यमिकचे मुख्याध्यापक संतोष सुसे, तसेच शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक संतोष सुसे यांनी शाळेच्या दरवर्षी एसएससी बोर्डाच्या उत्कृष्ट निकालाबद्दल माहिती दिली. वर्षभर विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी करुन घेण्यात आलेली तयारी व विशेष तासामुळे विद्यार्थी उत्तमपणे परीक्षेला सामोरे जात असल्याचे त्यांनी माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के यांनी केले.
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, स्पर्धा परीक्षेतून अधिकारी झालेल्यांचा आदर्श समोर ठेऊन, त्यांचे व्यक्तिमत्व व कष्ट पाहून प्रेरणा घ्यावी. स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावे. परिस्थितीला सामोरे जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध केल्यास यश प्राप्त होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे गुणवैशिष्ट्य आहे, ते गुण ओळखून त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थी दशेत टाकलेला प्रत्येक पाऊल भविष्याचे भवितव्य घडविणारा आहे. परीक्षेचे व जीवनाचे नियोजन केल्यास ध्येय प्राप्ती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सचिन बर्डे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन कले. तर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात विद्यालय व मार्गदर्शक अध्यापकांबद्दल ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका गायकवाड यांनी केले, तर अमोल मेहेत्रे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. श्रुती पेंटा यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शालेय शिक्षकांनी परिश्रम घेतले.