कवी संजय महाजन यांचे दुसरे काव्य संग्रह
जीवनातील विविध अनुभव, भावना, ग्रामीण भागातील संघर्ष आणि भक्तीचा मिलाफ
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रविवार दि.12 जानेवारी रोजी होणाऱ्या सातव्या काव्य संमेलनात कवी संजय महाजन यांच्या विमलकाव्य संग्रहाचे प्रकाशन होणार आहे. विमलकाव्य संग्रहात जीवनातील विविध अनुभवांचे आणि भावना काव्यातून व्यक्त करण्यात आल्या असल्याची माहिती काव्य संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.

काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष खासदार निलेश लंके यांच्या हस्ते विमलकाव्य संग्रहाचे प्रकाशन होणार असून, यावेळी साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, कवियत्री सरोज आल्हाट, संमेलनाच्या अध्यक्षा अनिता काळे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, गझलकार रज्जाक शेख उपस्थित राहणार आहेत.
विमलकाव्य संग्रहात कवी संजय महाजन यांनी प्रेम, निसर्ग, सामाजिक घटनांचे प्रतिबिंब तसेच घरगुती जीवनातील साध्या क्षणांचे चित्रण काव्यातून केले आहे. या संग्रहातील आस लागली मनाला…, प्रेमातील आठवणींचे हळवे चित्र रंगवते, तर अबोला नात्यांमधील ताण-तणावांना हलक्याफुलक्या शैलीत मांडते. अवकाळी पाऊस आणि पंढरीची वारी या कवितांमधून ग्रामीण भागातील संघर्ष आणि भक्तीमय भावनांचा सुंदर मिलाफ दिसतो. महाजन यांचे हे दुसरे काव्य संग्रह असून, पहिल्या काव्य संग्राहाला मिळालेल्या प्रतिसादानंतर त्यांनी अधिक प्रगल्भतेने कवितांमधून वाचकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.
